मनोरंजन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:57 PM2019-02-10T21:57:52+5:302019-02-10T21:58:18+5:30

टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने ‘पे चॅनल’ची पॅकेज प्रणाली केबल आॅपरेटरांना लागू केल्यामुळे मनोरजंन महागले आहे.

Entertainment is expensive | मनोरंजन महागले

मनोरंजन महागले

Next
ठळक मुद्देट्रायच्या नियमांची अंमलबजावणी : ग्राहकांची केबल आॅपरेटरकडे धाव

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने ‘पे चॅनल’ची पॅकेज प्रणाली केबल आॅपरेटरांना लागू केल्यामुळे मनोरजंन महागले आहे.
१ फेब्रुवारीपासून आपले आवडते चॅनल निवडण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. मात्र, ग्राहकांनी आवडती चॅनल घेतल्यानंतरही केबलचे भाडे पूर्वीपेक्षा अधिक झाल्याची वस्तुस्थिती आहे. पूर्वी २०० ते २५० रुपयांमध्ये मिळणाऱ्या बहुतांश चॅनलसाठी ग्राहकांना आता ३०० ते ४०० रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
ग्राहकांमध्ये मनोरंजनासाठी कमीत कमी पैसा खर्च करण्याची धारणा आहे. पूर्वी अ‍ॅनालॉग चॅनल्स पाहताना ग्राहकांना केवळ शंभर रुपयेच खर्च करावे लागत होते. त्यानंतर सेटटॉप बॉक्सने सर्वांनाच डिजीटल प्रणालीची भुरळ पाडली. मात्र, केबल भाडे शंभरावरून थेट दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले. २०० ते २५० रुपयांमध्ये ग्राहकांना सर्व प्रकारची चॅनल मिळत असल्याने ग्राहक समाधानी होते. मात्र, आता ट्रायच्या नवीन प्रणालीमुळे केबल भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतीय दुरसंचार विनियामक प्राधिकरणाने लागू केलेल्या नवीन प्रणालीची अमंलबजावणी सुरु झाल्याने अमरावतीमधील ग्राहकांनी केबल आॅपरेटरकडे धाव घेतली आहे. केबल आॅपरेटर ग्राहकांकडून अर्ज भरून घेत असून, त्यामध्ये ग्राहकांना आवडेल ते चॅनल्स निवडण्याची संधी मिळाली आहे.
‘फ्री टू एअर’च्या १०० चॅनल्ससाठी ग्राहकांना १३० रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त पे चॅनल्ससाठी वेगळी रक्कम ग्राहकांना मोजावी लागत आहे. १३० रुपये फ्री टू एअर चॅनल्स, ग्राहकांनी निवडलेले पे चॅनल्स व जीएसटी १८ टक्के ही सर्व रक्कम ३०० ते ४०० रुपयांच्या घरात जात आहे. ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक केबल भाडे भरावे लागत असल्यामुळे आता ग्राहकांचा विरोध सुरु झाला आहे. ग्राहक केबल आॅपरेटरांवर रोष व्यक्त करीत असून, काही ग्राहक तर जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी सुध्दा जाणार असल्याचे बोलले जाते.
पे चॅनल बंद,फ्री टू एअर सुरू
१ फेबु्रवारी २०१९ रोजीपासून शहरातील बहुतांश एसएसओंनी पे चॅनल्स बंद केली असून, केवळ फ्री टू एअर चॅनल्स सुरु ठेवली आहेत. केबल आॅपरेटरांकडून मिळालेले अर्ज ग्राहक भरून देत आहे. मात्र, प्रत्येक ग्राहकांचे आवडीचे चॅनल्स अ‍ॅक्टिव्ह करताना केबल आॅपरेटरांची दमछाक उडाली आहे. शहरात बहुतांश केबल आॅपरेटरांच्या घरी व कार्यालयावर ग्राहकांची मोठी गर्दी आहे. प्रत्येक ग्राहक आपआपल्या आवडीनिवडीचे चॅनल्स सुरु करण्यासाठी चढाओढ करीत असल्याने हे स्थिती बनली आहे.

केबलचे चॅनल आता पुर्वीपेक्षा महाग झाले आहे. मनोरंजनासाठी इतका खर्च करणे, सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पूर्वीप्रमाणेच दर करण्याची मागणी शासनाकडे करू.
- प्रशांत कंठाळे, ग्राहक

ग्राहकांकडून अर्ज भरून त्यांना आवडेल तीच चॅनल्स दिले जात आहे. मात्र, केबलच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या रोषाला आम्हालाच सामोरे जावे लागत आहे.
- निलेश ठाकरे,
केबल आॅपरेटर.

Web Title: Entertainment is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.