१०० दिवसांत ७३ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:56 PM2018-04-11T23:56:56+5:302018-04-11T23:56:56+5:30

73 Suicides in 100 days | १०० दिवसांत ७३ आत्महत्या

१०० दिवसांत ७३ आत्महत्या

Next
ठळक मुद्देधक्कादायक वास्तव : दर १८ तासांत शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूलाशेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र केव्हा?

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र अटी-शर्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत ७३ शेतकºयांनी मृत्यूचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर १८ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात १० एप्रिल २०१८ पर्यंत ३ हजार ३९८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ४०७ प्रकरणे पात्र, १ हजार ९३४ अपात्र, तर ५७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. २००१ मध्ये ११ प्रकरणे होती. २०१६ मध्ये ३४९, तर गतवर्षी २७४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यंदा जानेवारी महिन्यात २३, फेब्रुवारी २०, मार्च २६ व एप्रिलच्या १० दिवसांत चार शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
गेल्या १७ वर्षांचा आढावा घेता सर्वाधिक ३२३ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यात २६७, फेब्रुवारी २९०, मार्च २७९, एप्रिल ३०५, मे २८६, जून २५७, जुलै २६२, सप्टेंबर ३१५, आॅक्टोबर २८४, नोव्हेंबर २७९ व डिसेंबर महिन्यात २७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे शासन नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामातील पेरणीपश्चात दरवर्षी शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे वास्तव आहे.
शेतकरी स्वावलंबन मिशन कुचकामी
राज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगस्ट २०१५ रोजी राज्य शासनाने या मिशनची पुनर्रचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.
बळीराजा चेतना अभियान केव्हा?
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असताना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.

Web Title: 73 Suicides in 100 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.