रिलायन्सने १२ लाखांचा दंड भरलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:52 AM2017-11-15T01:52:29+5:302017-11-15T01:52:45+5:30

शहरात फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने महापालिकेची ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली होती. या प्रकरणात मनपा प्रशासनाने रिलायन्स कंपनीला बारा लाखांचा दंड आकारला होता. मनपाच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे समोर आले आहे.

Reliance does not pay fine of 12 lakhs! | रिलायन्सने १२ लाखांचा दंड भरलाच नाही!

रिलायन्सने १२ लाखांचा दंड भरलाच नाही!

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या पत्राला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने महापालिकेची ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली होती. या प्रकरणात मनपा प्रशासनाने रिलायन्स कंपनीला बारा लाखांचा दंड आकारला होता. मनपाच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 
दक्षिण झोनमधील कौलखेड, खडकी परिसरात रिलायन्स कंपनीच्यावतीने फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. २२ सप्टेंबर रोजी खोदकाम करताना, कंपनीकडून अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी किमान तीन दिवसांचा अवधी लागणार होता. पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. या प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने रिलायन्स कंपनीला पत्र पाठवून जलवाहिनी दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि पाण्याच्या अपव्यय झाल्यामुळे चार लाख रुपये असा एकूण बारा लाखांचा दंड आकारला होता. दीड महिना उलटून गेल्यानंतरही रिलायन्स कंपनीने मनपाकडे दंडाची रक्कम जमा केली नाही. मनपाकडून कंपनीला झुकते माप दिल्या जात असल्याचा आरोप करीत भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी मनपासह कंपनीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंपनीने दंडाने रक्कम जमा न केल्यास, फौजदारी तक्रार करण्याची मागणी नगरसेवक विजय इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

रिलायन्स कंपनीने दंडाची रक्कम भरण्यास विलंब केल्याची बाब मान्य आहे; परंतु कंपनीला कोणतीही सूट न देता, दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत कंपनीने दंडाची रक्कम जमा न केल्यास फौजदारी स्वरूपाची तक्रार नोंदविण्याचा मार्ग मोकळा आहे. 
- सुरेश हुंगे, 
कार्यकारी अभियंता, जलप्रदाय, मनपा.

Web Title: Reliance does not pay fine of 12 lakhs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.