अंतराळातील प्रवास एक विलक्षण अनुभव
By admin | Published: February 28, 2015 02:08 AM2015-02-28T02:08:47+5:302015-02-28T02:08:47+5:30
आनंद घैसास यांचे प्रतिपादन.
अकोला: अंतराळात पहिला मानव जाण्याच्या घटनेला अर्धशतकापेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. मात्र त्यानंतरही अंतराळातील जीवनाबाबत माहितीचा अभाव आहे. अंतराळातील प्रवास एक विलक्षण अनुभव असल्याचे प्रतिपादन डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी डॉ. आनंद घैसास यांनी शुक्रवारी येथे केले. स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ, भूगोल व भूगर्भशास्त्र विभाग व आम्ही सारे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथील वैज्ञानिक अधिकारी डॉ. आनंद घैसास यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. एम. आर. इंगळे, डॉ. गजानन नारे, डॉ. आशिष राऊत, प्रा. दत्ता भारसाकळे उपस्थित होते. प्रास्ताविक व मुख्य वक्त्यांचा परिचय डॉ. गजानन नारे यांनी करून दिला. अंतराळात मानवाला कसे पाठविले जाते, त्या ठिकाणी अंतराळवीर कसे राहतात, काय जेवतात, कसे झोपतात, अंतराळात स्त्रीला गर्भधारणा शक्य आहे का? स्पेसवॉक म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरे डॉ. आनंद घैसास यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून दिली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ४0 शाळांचा समावेश होता. प्रत्येक शाळेतून ५ विद्यार्थी व १ शिक्षक अशी चमू तयार करण्यात आली होती. अंतराळातील जीवन कठीण आहे, जीवनावश्यक साधनांचा अभाव त्या ठिकाणी आहे, किरणोत्सरी घटकांचा पर्यावरणावर परिणाम होत असल्यामुळे हा प्रवास धोकादायक असतो, असे त्यांनी सांगितले. शून्य गुरूत्वाकर्षणावर असलेला अनुभव त्यांनी कथित केला. दिशा कशा ओळखाव्यात, पाण्याखाली काम करण्याचे प्रशिक्षण अंतराळवीरांना मेक्सिकोच्या वाळवंटात दिले जाते, असे त्यांनी सांगितले.