‘समाजकल्याण’मध्येही पुरवठादारांचे कल्याण
By admin | Published: July 7, 2016 11:15 PM2016-07-07T23:15:29+5:302016-07-07T23:22:49+5:30
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर जिल्हा परिषदेत सध्या अंगणवाडी सेविकांच्या कपाट खरेदीचा विषय गाजत आहेत.
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
जिल्हा परिषदेत सध्या अंगणवाडी सेविकांच्या कपाट खरेदीचा विषय गाजत आहेत. तालुक्या-तालुक्यात या खरेदीची चौकशी सुरू असतांना आता समाज कल्याण विभागातील ९० लाखांच्या पत्रे व पाईप योजनेत पुरवठादाराने हलक्या प्रतिच्या साहित्याचा पुरवठा केल्याचे समोर आले आहे. यामुळे या योजनेतील साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येत असून प्रशासनाने पुरवठादारांचे पेमेंट थांबविले आहे.
जिल्हा परिषद महिला वा बालकल्याण, समाजकल्याण, कृषी विभाग यांच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या सायकल, शिलाई मशिन, पिठाची गिरणी तसेच कृषीचे वेगवेगळे साहित्य, अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी जिल्हा परिषदेने खरेदी केलेल्या व पंचायत समितीच्या गोदामात तालुकास्तरावर निकृष्ठ, हलक्या दर्जाचे साहित्य धूळखात पडून असून त्यात आणखी भर पाडण्याचे काम सुरू आहे.
जि.प. समाजकल्याण विभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जामाती आणि अन्य मागासवर्गींयासाठी पत्रे-पाईप योजना राबवते.
यात ३२ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबांना घरावर छत उभरण्यासाठी १२ फू ट लांबीचे ८ पत्रे व २० फू ट लांबीचे ३ पाईप यांचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी समाज कल्याण विभागाच्या बजेटमध्ये चालू वर्षी ९० लाख रुपयांची तरतूद करून योजना राबवण्यात आली.
योजनेत साहित्याचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांनी निविदा भरून अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरवठादाराला समाजकल्याण विभागाने साहित्याचा पुरवठा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुरवठादाराने पत्रे व पाईपचा पुरवठा केला.
निविदेत जो मंजूर पाईप होता, त्याऐवजी दुसऱ्या कंपनीच्या पाईपचा पुरवठा झालेला आहे. तसेच मंजुरीपेक्षा कमी वजनाच्या पत्र्यांचा पुरवठा झाला. त्यावर आयएसआय मानांकनाचा शिक्का नाही. सुरूवातीला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रशासानाने या साहित्याच्या तपासणीसाठी समिती नेमली.
या समितीच्या अहवालानुसार योजनेत मंजूर एका पत्र्याचे वजन १८ किलो ५० ग्राम हवे असतांना प्रत्यक्षात पत्र्याचे वजन १७.५० भरत आहे. पाईप दर्जा कमी असल्याने ते बदलून घ्यावे लागणार आहेत.
समाजकल्याण विभागासह ३० लाख रुपयांची शिलाई मशीन योजना, ३० लाख रुपयांची सायकल योजना राबवत आहे. या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे आवश्यक बनले आहे.
कोणत्याही प्रकारे गुणवत्तेत तडजोड नाही. पत्रे व पाईप या साहित्याची तपासणी करण्यात आली. पुरवठादाराने पुरवठा केलेल्या साहित्यात पत्र्याचे वजन ५ टक्क्यांनी कमी आहे. यामुळे संबंधित पुरवठादार यांचे पेमेंट अदा केलेले नाही. काही ठिकाणी पत्र्यावर आयएसओ मानांकन नसून हा मालच बदलून घेण्यात येणार आहे.
-डॉ. अशोक कोल्हे,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.