मुळा, प्रवरेची पाणी पातळी वाढली; कळसचा पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:48 PM2017-08-30T15:48:54+5:302017-08-30T15:53:07+5:30
भंडारदरा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे़ त्यामुळे अकोल्यातील अगस्ती पूल व कळस येथील पूल पाण्याखाली गेला आहे.
राजूर/कळस : अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रवरा आणि मुळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कळस येथील पूल पाण्याखाली गेला असून प्रवरेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़
दोन दिवसांपासून भंडारदार, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरु आहे़ त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून भंडारदरा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे़ त्यामुळे अकोल्यातील अगस्ती पूल व कळस येथील पूल पाण्याखाली गेला आहे. यावर्षी दोन वेळा पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारदरा धरणातून ९ हजार १७ क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे तर निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १५ हजार २०० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे़ त्यामुळे प्रवरेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.