संडे Motivation : रेवडी उद्योगाचा सुवर्णमहोत्सव : प्रसिद्ध मढीच्या यात्रेने गाठली पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 03:20 PM2019-02-24T15:20:23+5:302019-02-24T15:20:29+5:30

श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील राज्यभर ख्याती असलेला महायात्रोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या यात्रेत खास मान असलेली रेवडी बनविण्याच्या उद्योगाने मढी-तिसगाव रस्त्यालगतच्या उत्पादन केंद्रांवरील रेवडी बनविण्यास वेग आला आहे.

Sunday Motivation: Golden Jubilee of Revdi Industries: Fifty Years Arrival by Famous Madhi Yatra | संडे Motivation : रेवडी उद्योगाचा सुवर्णमहोत्सव : प्रसिद्ध मढीच्या यात्रेने गाठली पन्नाशी

संडे Motivation : रेवडी उद्योगाचा सुवर्णमहोत्सव : प्रसिद्ध मढीच्या यात्रेने गाठली पन्नाशी

Next

चंद्रकांत गायकवाड
तिसगाव : श्रीक्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील राज्यभर ख्याती असलेला महायात्रोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या यात्रेत खास मान असलेली रेवडी बनविण्याच्या उद्योगाने मढी-तिसगाव रस्त्यालगतच्या उत्पादन केंद्रांवरील रेवडी बनविण्यास वेग आला आहे. यंदाचा पन्नासावा यात्रोत्सव असल्याने यात्रेसोबतच रेवडी उद्योगानेही सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
रेवडी व्यावसायिकांची यंदाची ही पन्नासावी मढी यात्रा आहे.आयुर्वेदात महत्त्वाचे मानल्या गेलेला बहुगुणी गूळ व तीळ (हावरी),फुटाण्याचे पीठ यापासून रेवडी बनविण्याची परंपरा आजही टिकून आहे. आकर्षक बांगडीच्या आकाराची गोल, भाकरीच्या आकाराची रेवडी आता पेढेवजा आकारात नव्या बदलात रूपांतरीत झाली आहे.
कानिफनाथ देवस्थानचे सचिव सुधीर मरकड म्हणाले,नवसपूर्ती व देवालय परिसरातील आनंदोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने कानिफनाथ समाधी मंदिरावर रेवडी उधळण्याची परंपरा आहे. यात्रा उन्हाळ्यात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ही रेवडी थंडावा देऊन पचनासाठी पूरक ठरते. त्यामुळे आरोग्य व धार्मिकता अशा दोन्ही भावनेतून रेवडीची उच्चांकी खरेदी येथे होते.
सरपंच भगवान मरकड म्हणाले, मढी-तिसगाव रस्त्यालगतच्या रेवडी उत्पादकांमुळे आमच्या गावची सर्वदूर ओळख पसरली आहे.

दरवर्षी ४० टन रेवडीची निर्मिती
गणीभाई शेख सध्या थकले असले तरी त्यांच्या अर्धांगिनी साहीबजान व मुलगा बाबूलाल रेवडीच्या उत्पादनात अग्रस्थानी आहेत. त्यांच्या मिलन रेवडी सेंटरमधील रेवडीला सर्वदूर मागणी व ओळख निर्माण झाल्याने या रेवडीचा मढी यात्रोत्सवात सर्वाधिक बोलबाला असतो. तिसगाव शहरातील अहमद शेख, गणीभाई शेख, नसीर शेख व शरद भुजबळ अशा चार व्यावसायिकांच्या उत्पादन केंद्रांवर दरवर्षी किमान ३८ ते ४० टन रेवडीची निर्मिती होते.

कशी बनते रेवडी
रेवडीची पाककृती सांगताना बाबूलाल शेख म्हणाले, तयार फुटाणे विकत घेऊन त्याचे पीठ करायचे. वितळविलेल्या गुळाच्या पाकात त्याचे मिश्रण करून ते हाताने कडक होईपर्यंत ओढायचे. नंतर त्याच्या विविध आकाराच्या रेवड्या करून त्यास तीळ (हावरी)लावायची, अशी रेवडी बनविण्याची पद्धती आहे. सध्या मात्र गूळ फोडणे, रेवडी मिश्रण ओढणे यासाठी मशिनरी घेतली आहे. जळण म्हणून आजही आम्ही लाकूडच वापरत आहोत. त्यामुळे रेवडीची चव अजूनही टिकून आहे. केवळ मढी यात्रा नजरेसमोर ठेऊनच तीन ते चार महिन्यांच्या कालखंडात रेवडीचे उत्पादन केले जाते. वर्षभर इतर मिठाई विकण्याचे काम केले जाते.

 

 

Web Title: Sunday Motivation: Golden Jubilee of Revdi Industries: Fifty Years Arrival by Famous Madhi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.