झेंडू, शेवंती, अष्टर फुलांची कोट्यवधींची उलाढाल
By admin | Published: October 2, 2014 11:44 PM2014-10-02T23:44:26+5:302014-10-02T23:50:28+5:30
पारनेर : कांद्याला कमी भाव, अपुऱ्या पावसाने मूग, वाटाणा ही महत्वाची पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना शेवंती, अष्टर व झेंडुला सध्या चांगले भाव आहेत.
पारनेर : कांद्याला कमी भाव, अपुऱ्या पावसाने मूग, वाटाणा ही महत्वाची पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना शेवंती, अष्टर व झेंडुला सध्या चांगले भाव आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील फूलशेतीने त्यांना सावरले आहे. या फूल शेतीतून कोट्यावधींची उलाढाल होत आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे फूल उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पावसाळा संपत आला तरी तालुक्यात अजून पुरेसा पाऊस नाही. अनेक तलाव अजुनही कोरडे आहेत. शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे मूग, वाटाणा पीक यंदा पावसामुळे हातातून गेले.
त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे पन्नास ते साठ कोटींचे नुकसान झाले. ही पिके गेल्याने बाजारपेठेत फिरणारे सुमारे पन्नास ते साठ कोटींचे अर्थकारणच ठप्प झाले आहे. त्याचा फटका व्यापारी क्षेत्रालाही सर्वत्रच बसला. (तालुका प्रतिनिधी)
फूलशेतीने सावरले : प्रतिकूल हवामानामुळे पिकावर परिणाम
फूलशेतीचा पर्याय
मूग व वाटाणा ही महत्वाची पिके हातातून गेल्यानंतर व कांद्याला कमी भाव मिळाल्यानंतर पारनेर, हंगा, कान्हूरपठार, निघोज, सुपा, म्हसणे, दैठणेगुंजाळ, वाळवणे, बाबुर्डी, रायतळेसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी सध्या फूल शेतीचा पर्याय निवडला आहे. दसरा, दिवाळीला मोठ्या प्रमाणात फुलांना मागणी असते. याचा अभ्यास करून तालुक्यात सुमारे तीनशे ते चारशे हेक्टरवर फुलशेतीची लागवड झाली आहे. सुप्याजवळील नगर तालुक्यातील चास, कामरगाव, सारोळा कासार येथेही फुलशेतीचे उत्पादन चांगले आहे. नगर-पुणे महामार्गावरील सुपा परिसर हार उत्पादनासाठी राज्यात प्रसिध्द आहे. तेथेच अनेक फूल उत्पादकांना विक्रीसाठी व्यापारपेठ उपलब्ध आहे.
अष्टर, शेवंतीने तारले
झेंडुला सध्या चाळीस ते पन्नास रूपये किलो भाव असला तरी शेवंती व अष्टरला किलोमागे दीडशे ते दोनशे रूपये भाव असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना तारले आहे. मागील वेळी भाव अचानक पडल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे दुर्लक्ष केले होते. पाऊसच कमी असल्याने विहिरींमधील पाणी कमी होते म्हणून अनेक भागात फुलशेतीचे उत्पादन कमी झाले. फुलांचा भाव वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़
भाव चांगला, उत्पादन घटले
अष्टर व शेवंतीला सध्या भाव चांगला आहे. परंतु हवामानातील परिणाम व पाणी कमी असल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे. दसऱ्याला अपेक्षित उत्पादन झाले नाही. मुंबईला दीडशे ते दोनशे रूपये भाव मिळतो.
-भाऊसाहेब अंबुले, फूल उत्पादक शेतकरी
फूलशेतीे क्षेत्रात घट
फुलशेतीतून कोट्यावधींची उलाढाल होत होती. परंतु कमी पावसाचा फटका त्याला बसला असून एक ते दोन हजार हेक्टरवर होणारी फुलशेती यावर्षी फक्त दोनशे ते तीनशे हेक्टरवरच होत आहे.
- निलेश जाधव, आत्मा कृषी केंद्र