राष्ट्रवादीने चांगल्या संस्था बंद पाडल्या
By admin | Published: October 2, 2014 11:45 PM2014-10-02T23:45:40+5:302014-10-02T23:50:18+5:30
राहाता : राज्यात विविध पातळीवर काम करताना, कायम जनतेचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पारदर्शक कारभार करता आला. राज्य भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केला हे मी सांगण्याची गरज नाही,
राहाता : राज्यात विविध पातळीवर काम करताना, कायम जनतेचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पारदर्शक कारभार करता आला. राज्य भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केला हे मी सांगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. चांगल्या संस्था बंद पाडण्याचे काम राष्ट्रवादीने केल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी मतदारसंघातील दाढ बुद्रुक येथे आयोजित केलेल्या विविध भागातील बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सुभाष गाडेकर, माजी उपसभापती प्रल्हाद बनसोडे, विखे पाटील कारखान्याचे संचालक देवीचंद तांबे, सरपंच रावसाहेब गाडेकर, उपसरपंच सुभाष तांबे, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, श्रावण वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपासोबत आहे. मंत्री म्हणून काम करताना मोठा संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादीने अनेक महत्त्वाचे खाते घेऊन त्यात भ्रष्टाचार केला. तसेच काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यासह आमदारांना त्रास देण्याची भूमिका घेतली. आज भ्रष्टाचार करणारेच स्वच्छ प्रशासनाची भाषा करतात. शिर्डी मतदारसंघ विकासकामामध्ये राज्यात पुढे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी यासह वैयक्तिक लाभार्थींच्या योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे मतदारसंघाची राज्यात चर्चा होते. आता हवा फक्त काँग्रेसचीच आहे, असा दावा विखे यांनी केला.
मुळा-प्रवरा वीज संस्था बंद पाडण्याचे पाप कोणी केले, हे संस्थेच्या सभासदांसह मतदारांना चांगले माहीत आहे. चांगली संस्था बंद पाडण्यामध्ये विरोधकांचाही सहभाग मोठा होता. मुळा प्रवरेच्या कामगारांची चिंता तुम्ही करू नका, त्यासाठी मी समर्थ आहे. केवळ निवडणुकीच्या वेळी या कामगारांचा पुळका आपल्याला येतो. पाच वर्षे संस्था आणि कामगारांची आठवण आपल्याला झाली नाही का? प्रश्न कोणी सोडवला, हे कामगारांना माहीत असल्याने ते तुम्हाला थारा देणार नाहीत. सिंचन घोटाळा सर्वप्रथम आपण समोर आणला असे सांगतानाच आज जिल्ह्याचा पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. याविषयी बोलण्याचे धाडस कुणीही केले नाही. गावतील विविध विकास कामावर भाष्य करत दाढ बु. व दाढ खु. या नवीन पुलामुळे माणसं जोडण्याचे काम आपण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांवरती भर दिल्याने मतदारांमध्ये नवचैतन्य असून, ही निवडणूक खऱ्या अर्थाने मतदारांची हातात घेतली आहे. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा यानिमित्ताने घेत असल्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने हे मोठे फिलगुड मानले जाते. दाढ बुद्रुक येथे रावसाहेब रामभाऊ तांबे, संजय माकावणे, सावकार माकावणे आदींनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जनहिताच्या अनेक योजना काँग्रेसने आणल्या आहेत. त्याचे श्रेय आता मोदी सरकार घेत आहे. सर्वसामान्यांना आधार फक्त काँग्रेसच देऊ शकते. आज स्वतंत्र लढत असल्यामुळे राज्यात काँग्रेसचेच सरकार येईल असा आशावादही विखे यांनी व्यक्त केला. यावेळी देवीचंद तांबे, श्रावण वाघमारे, अॅड. भानुदास तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.