अनुदानासाठी ६ वर्षांनंतर दुभत्या जनावरांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:00 AM2017-08-07T04:00:43+5:302017-08-07T04:00:43+5:30
दुष्काळाने खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी सरकारने शेकडो योजना सुरू केल्या़ मात्र अनुदान मिळण्यास लालफितीचा कारभार आडवा येत असून, बँक प्रकरणे केलेल्या अहमदनगरसह सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांकडील दुभत्या जनावरांचा सहा वर्षांनंतर शोध सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़
अण्णा नवथर
अहमदनगर : दुष्काळाने खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी सरकारने शेकडो योजना सुरू केल्या़ मात्र अनुदान मिळण्यास लालफितीचा कारभार आडवा येत असून, बँक प्रकरणे केलेल्या अहमदनगरसह सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांकडील दुभत्या जनावरांचा सहा वर्षांनंतर शोध सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़
सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेली जनावरे शेतकºयांच्या दावणीला आहेत की नाही, याची खात्री करूनच शेतकºयांना अनुदान वितरीत केले जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सरकारच्या बहुतांश योजना कर्ज आणि त्यावर अनुदान, अशा स्वरुपाच्या आहेत. बँकांकडून कर्ज वाटप होते़ परंतु, त्यावरील सरकारी अनुदान शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होत नाही़ सरकारी काम आणि सहा महिने थांब, या म्हणीचा अनुभव दुग्ध व्यवसाय विकास योजनेंतर्गत गाई-म्हशींची बँक प्रकरणे करणाºया ४ हजार ८०० शेतकºयांना आला आहे़ २०११ मध्ये सुरू केलेल्या दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकास योजनेंतर्गत उपरोक्त तिन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांच्या प्रस्तावांना मंजुरीही मिळाली़ शेतकºयांनी गाई, म्हशी खरेदी केल्या़ दूध व्यवसाय सुरू केला़ मात्र त्यांना अनुदान मिळाले नाही़
बँकांचे उंबरे झिजवून शेतकरी थकले़ सरकारला उशिरा का होईना पण जाग आली़ सहा वर्षांपूर्वीची बँक प्रकरणे पडताळणीसाठी पशूसंवर्धन विभागाकडे आली असून, त्याची पडताळणी करून एकट्या नगर जिल्ह्यातील २ हजार ४८७ प्रकरणे अनुदानासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केली आहे़त. तेथून ती नाबार्डकडे पाठविली जाणार आहेत़ पात्र लाभार्थींना नाबार्डकडून अनुदान वितरीत केले जाईल. त्यासाठी आणखी किती दिवस लागतील, असा सवाल शेतकरी करत आहेत.