मुबलक वीज असताना भारनियमनाचे चटके!
By admin | Published: September 30, 2014 01:02 AM2014-09-30T01:02:08+5:302014-09-30T01:29:37+5:30
चंद्रकांत शेळके , अहमदनगर गेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे.
चंद्रकांत शेळके , अहमदनगर
गेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. उच्च वाहिन्यांतील तांत्रिक बिघाडाचे कारण यासाठी दिले जात आहे.
राज्यातील समाधानकारक पावसामुळे धरणांची स्थिती उत्तम असून, वीजनिर्मिती केंद्रही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत. पावसाळ््यात बहुतांश कृषिपंप बंदच होते. परिणामी विजेची मागणी घटली. त्यामुळे राज्यात मागणीच्या प्रमाणात वीज उपलब्ध आहे. सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना भारनियमनातून दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून विजेचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली. सध्या राज्यात १२ ते १३ हजार मेगावॅट विजेची मागणी असून तेवढी वीज उपलब्ध करण्यात आली आहे.
परंतु शनिवारपासून औरंगाबाद ते पॉवरग्रीड ४०० केव्हीए, वर्धा ते औरंगाबाद ७६५ केव्हीए व औरंगाबाद ते तळेगाव ४०० केव्हीए या विद्युत वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठ्यात विस्कळीतपणा आला. परिणामी राज्यात तांत्रिक बिघाडाचे कारण देत महावितरणने चार तास भारनियमन सुरू केले. नवरात्रोत्सव काळात भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने अधिकृतपणे जाहीर केले होते, त्यास ४८ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा वीज पुरवठा विस्कळीत झाला.
बिघाड किरकोळ असल्याने सायंकाळपर्यंत दुरूस्ती होऊन पुरवठा सुरळीत होण्याचे संकेतही महावितरणकडून दिले. शनिवार, रविवार व सोमवार सायंकाळपर्यंतही भारनियमन सुरूच असल्याने ग्राहकांचा संताप अनावर झाला. राष्ट्रपती राजवट लागल्याने सर्व सूत्रे प्रशासनाकडे गेली. एका अर्थाने राज्याला हक्काचा पालक राहिला नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरच नेमके भारनियमन कसे सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.