न्याय, स्वातंत्र्य, समता धोक्यात : सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:01 AM2019-01-12T10:01:14+5:302019-01-12T10:02:02+5:30
सद्यस्थितीत देशातील न्याय, समता, बंधुता, धोक्यात आली आहे़ सामाजिक विद्वेषाचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे़
संगमनेर : सद्यस्थितीत देशातील न्याय, समता, बंधुता, धोक्यात आली आहे़ सामाजिक विद्वेषाचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे़ अल्पसंख्यांकांना गुन्हेगार ठरवले जात आहे़ बहुसंख्यांक गुन्हेगार निर्दोष सुटत आहेत़ हा कसला न्याय आहे? असा परखड सवाल ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केला़
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणारा स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार द्वादशीवार यांना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ तसेच हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंंदे पुरस्कार विलास शिंदे यांना व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार बाजीराव खेमनर यांना प्रदान करण्यात आला़ यावेळी हरियाणाचे खासदार दीपेंदरसिंग हुडा, हिंगोलीचे खासदार राजीव सातव, अल्पसंख्यांक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नदीम जावेद, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते़
द्वादशीवार म्हणाले, हा पुरस्कार मी स्वातंत्र्यसैनिकांचा आशीर्वाद घेऊन स्वीकारतो़ मात्र, ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्यसैनिक लढले, ती मूल्येच आज पायदळी तुडविली जात आहेत़ गायींच्यासाठी आज सुरक्षा दिसते़ पण ही सुरक्षा गायींच्यासाठी नाहीच़ मुस्लिमांना डिवचण्यासाठी आहे़ आई, बाईपेक्षा गायी सुरक्षित आहेत़ यातून अल्पसंख्यांकांचा द्वेष हाच हेतू आहे़ ज्या दिवशी या देशातल्या खासदारांनी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पैसे मागितले, त्या दिवशी लोकसभेची इज्जत धुळीस मिळाली़
राफेलसारखा घोटाळा दाबून सत्य बोलणाऱ्यांनाच बंद केले जात आहे़ दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचे मारेकरी सरकारला सापडू शकत नाही़ कारण ते त्यांच्याच घरात लपले आहेत़ ते सरकारसाठी वंदनीय आहेत़ मग सरकार त्यांना कसे पकडणार?, असा सवालही त्यांनी केला़
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे हे ग्रामीण विकासाचे शिल्पकार आहेत. भाऊसाहेबांनी सामान्य माणसासाठी सहकार उभा केला. हा सहकार महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशादर्शक आहे. या थोर पुरुषांच्या विचाराचा होणारा जागर नव्या पिढीला स्फुर्ती देणारा आहे.
सातव म्हणाले, राजकारणात व समाजकारणात थोरातांनी दिशादर्शक काम केले. मात्र सध्या भाजपा सरकार ग्रामीण भाग, शेतकरी, सहकार मोडीत काढत आहे. शेतकºयांकडे दुर्लक्ष केल्याने देशाची अधोगती होणार आहे.
माजी मंत्री थोरात म्हणाले, भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे यांचे विचार पुढच्या पिढींना कळावे म्हणून हा जयंती महोत्सव होत असतो. याप्रसंगी उद्योजक विलास शिंदे, बाजीराव खेमनर, माजी खासदार दादापाटील शेळके, पांडुरंग अभंग, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, करण ससाणे, रावसाहेब शेळके, पंडितराव थोरात, विजय बोºहाडे, उल्हास लाटकर, डॉ. राजीव शिंदे, उत्कर्षा रुपवते, अॅड.माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, शिवाजीराव थोरात, इंद्रजित थोरात, शोभा कडू, रोहिणी देशमुख, शरयु देशमुख, आरती थोरात, रामदास वाघ, सचिन गुजर, किरण पाटील, अजय फटांगरे, शंकर खेमनर, बाबा ओहोळ, निशा कोकणे, प्रा. केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते़
द्वादशीवार यांची लेखणी परखड - पाटील
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘द्वादशीवार यांची लेखणी परखड आहे. कानाखाली आवाज काढावा, अशी धार त्यांच्या लेखणीला असते़’ बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘द्वादशीवार यांचे विचार परखड असून, ‘लोकमत’मधील त्यांचे लेखन अत्यंत वस्तुनिष्ठ असते़’
थोरात यांनी राज्याचे नेतृत्व करावे
खासदार हुडा यांनी थोरात यांचे कौतुक केले. ते म्हणाले, राष्ट्रीय राजकारणात आमदार थोरात हे राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन नक्कीच होणार असून राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आमदार थोरातांकडे आहे. श्रीनिवास पाटील यांनीही थोरातांकडे सर्वजण आशेने पाहत असल्याचे सांगितले.