जेव्हा विकार उचल खातात, तेव्हा मनुष्य पशू होतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:44 PM2019-07-01T19:44:39+5:302019-07-01T19:46:44+5:30

आज जितकी प्रगती आपणास दिसत आहे, तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही का..?

When the disorders take off, the man becomes an animal | जेव्हा विकार उचल खातात, तेव्हा मनुष्य पशू होतो 

जेव्हा विकार उचल खातात, तेव्हा मनुष्य पशू होतो 

Next

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

अध्यात्मशास्त्रात विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्त्व आहे. खरं तर, माणसाचे मन एक कुरूक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार जास्त प्रमाणात उचल खातात व माणसाचा पशू होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा। सांडी तू अवगुणू रे भ्रमरा॥ 
 

कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा कांही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत. लोखंडाची वस्तू खूप गंजलेली असेल तर लोह चुंबक तिला आकर्षित करू शकत नाही. वरचा गंज खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते. ही विकार विवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे. एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे. पेरणीचा विसर पडावा. शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापावे तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज जितकी प्रगती आपणास दिसत आहे, तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही का..? याचे कारण माणसात बळावलेली विकार विवशता हेच आहे.

गोकुळातील एक गोपिका भगवंताला आतूरतेने हाक मारीत असे. देवा... एकदा माझ्या हृदय मंदिरात ये ना..? तुला बघावयाला मी खूप आतूर आहे. देव तिला रोज येण्याचे आश्वासन देत होते, पण येत काही नव्हते. एक दिवस ती गोपबाला म्हणाली, देवा तुझे न येण्याचे कारण तरी सांग..? देव म्हणाले, तुझे हृदय मंदिर स्वच्छ कर, मगच मी येईल. ती गोपिका आपला स्वानुभव कथन करते...
हरी या हो चला मंदिरी। कोणी नाही दुसरे घरी॥
काम दादला गेला बाहेरी। क्रोध सासू ती नाही घरी॥

देव हा माणसापासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत, असं वाटंत असेल तर हे विकार निर्मूलन झालेच पाहिजे. फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणात परिमळ ठेवून जातात, तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा भ्रमणध्वनी 9421344960 )

Web Title: When the disorders take off, the man becomes an animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.