मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:43 AM2019-06-03T04:43:44+5:302019-06-03T04:44:00+5:30

काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते

Two thoughts of human mind | मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी

मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी

Next

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

एका विशिष्ट क्षणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला दिलेला साज म्हणजे आटोपशीर, स्वयंपूर्ण असे शब्दरूप होय. त्यातून अभंग, काव्य किंवा साहित्यातील विविध प्रकारात मोडणारे वाङ्मय तयार होते. नंतर तोच विचार कायमस्वरुपी राहील असेही सांगता येत नाही. तो विचार नंतरच्या काळात निष्प्रभही होऊ शकेल. कारण ज्यावेळी संसारदु:खाने पोळलेली मनाची अवस्था असेल त्यावेळी त्याची स्थिती बिघडलेली असेल. संवेदनात्मक मनोभूमिकेत असणाऱ्या मनाची अवस्था त्या-त्या क्षणी सारखीच असू शकत नाही. विचारगर्भ किंवा भावनोत्कट मनाचे सहजोद्गार असतात. काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते. म्हणजे मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी आहेत. त्याचा आपण विचार करतो. मानवी जीवनाची कृतार्थता कोणत्या गोष्टीत आहे याचे विश्लेषण संतविचारांनी भावलेले मनच निर्णय देऊ शकते. मनाच्या या विविध आविष्कारामुळे त्याचा अधिकार समाजाच्या सर्व स्तरातून पाहायला मिळतो. प्रापंचिक दु:खांनी गांजलेले स्त्री-पुरुषाचे ‘मन’ नव्या आनंदमयी अशा वातावरणात रंगून जाते किंवा कधी-कधी आत्मसात केलेल्या ज्ञानाचे प्रात्यक्षिकिकरण दाखवते. साऱ्यांच्या जीवनाचे प्रयोजन मनच करीत असते. जन्म-मरणाच्या फेºयातून निरंतराची मुक्तता अनुभवण्याची किमयाही मनाचीच असते किंवा भक्तिप्रेमाचा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला पुन: पुन्हा हा जन्म मिळावा ही अपेक्षा करणारेही मनच होय. कारण ईश्वरकृपेचा अनुग्रह व्हावा ही अपेक्षा बाळगणारे मनच असते. यामुळे जीवनात सुख जिवापाड असले तरी दु:ख पर्वताएवढे असते. याचाही अनुभव घेणारे मन. परमेश्वराने आपल्याला या दु:खमय संसारातून सोडवावे असे वाटणारेसुद्धा ‘मन’च होय. काही जणांच्या जीवनात वैफल्य येऊन या संसाराला कंटाळवाणेही मनच असते, तर काही जणांच्या भावमनाने परमेश्वरापाशी पोहचविणारे मनच असते. या संसारातील सुख-दु:खांच्या पाठीमागे मनच कार्यरत असते. त्यामुळे सर्वकाही मनावरच अवलंबून आहे. मन आनंदी ठेवा. सर्वदूर आनंद मिळेल.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

 

Web Title: Two thoughts of human mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.