वन्यजीव हल्ले वाढले, आता गावातही होत आहे शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:00 AM2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:00:07+5:30
शिवराम काशीराम लोधी (वय ६५) यांचा मोरगाव शिवारात गट क्रमांक-३५८ मध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी त्यांनी लेब्रो जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या पोल्ट्रीफार्मवरील गडी जेवणाकरिता घरी गेले. ८.३० वाजता जेव्हा ते पोल्ट्रीफार्मवर परत आले तेव्हा त्यांना कुत्रा मेलेल्या अवस्थेत आढळला. या कुत्र्याचे पोट पूर्णतः फाडलेल्या स्थितीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळेच बिबटयांचे मानव व पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याच्या अनेक घटना तालुक्यात बघावयास मिळत आहेत. बिबट्यांचा सावजासाठी आता चक्क गावात शिरकाव होताना दिसत आहे. यात प्राणहानी होत नसली तरी वन्यजीव व मानव संघर्ष पेटला आहे. यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे.
यापूर्वी बरडटोली, दाभना, खांबी व घुसोबाटोला येथे गावात शिरून कोंबडी व बकऱ्यावर बिबट्याने ताव मारल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडेच चान्ना-बाकटी येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याचीसुद्धा घटना घडली आहे. बोंडगावदेवी गावानजीक मिलजवळ दोन बिबट दिसून आले. आता पोल्ट्रीफार्ममध्ये बांधलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना मोरगाव येथे २ दिवसांपूर्वी घडली. शिवराम काशीराम लोधी (वय ६५) यांचा मोरगाव शिवारात गट क्रमांक-३५८ मध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी त्यांनी लेब्रो जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या पोल्ट्रीफार्मवरील गडी जेवणाकरिता घरी गेले. ८.३० वाजता जेव्हा ते पोल्ट्रीफार्मवर परत आले तेव्हा त्यांना कुत्रा मेलेल्या अवस्थेत आढळला. या कुत्र्याचे पोट पूर्णतः फाडलेल्या स्थितीत होते.
लगेच त्यांनी पोल्ट्रीफार्ममधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता ते बघून चकितच झाले. कुत्र्याला ७ वाजतादरम्यान बिबट्याने ठार केल्याचा व्हिडिओ समोर आले. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. हा परिसर रामघाट जंगलाला लागून आहे. या जंगलात बिबट्यांची संख्या वाढत आहे. जंगल परिसराला लागून शेती असून लगतच लोधी यांचे पोल्ट्रीफार्म आहे.
या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याने गुराख्यांना अनेकदा दिवसाढवळ्या दर्शन दिले आहे. तोंडाला रक्ताची चव लागलेले हिंस्र पशुखाद्य मिळाले नाही तर गावाकडे धाव घेतात. गोठ्यात बांधलेल्या पाळीव पशूंना लक्ष्य बनवितात. अशा घटनांतही लक्षणीय वाढ झाली आहे. मानवावरील हल्लेसुद्धा वाढत असल्याने भीतीदायक वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने या हिंस्र पशूंचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.