आमदारांचा हस्तक्षेप जिल्हा परिषदेच्या जिव्हारी
By Admin | Updated: May 27, 2014 01:08 IST2014-05-27T01:08:34+5:302014-05-27T01:08:34+5:30
काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हा परिषदेला मिळणार्या २२ कोटींच्या विकास निधीत केलेला हस्तक्षेप सदस्यांच्या जिव्हारी लागला आहे. या हस्तक्षेपाचे आता आगामी विधानसभा निवडणुकीत उट्टे काढले

आमदारांचा हस्तक्षेप जिल्हा परिषदेच्या जिव्हारी
बहुतांश सदस्यांची नाराजी : विधानसभेत उट्टे काढण्याची तयारी
सुरेंद्र राऊत- यवतमाळ
काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हा परिषदेला मिळणार्या २२ कोटींच्या विकास निधीत केलेला हस्तक्षेप सदस्यांच्या जिव्हारी लागला आहे. या हस्तक्षेपाचे आता आगामी विधानसभा निवडणुकीत उट्टे काढले जाणार असून त्यासाठी अनेक सदस्यांनी आपल्या सर्कलमध्ये कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेला २२ कोटींचा विशेष विकास निधी मिळणार होता. या निधी वाटपाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी सदस्यांकडून कामांचे प्रस्तावही मागितले होते. मात्र जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार्या या निधीत जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांनाच काठावर ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले. डीपीसीच्या निधीच्या माध्यमातून काँग्रेस आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा आणि राष्टÑवादीला ताकद दिली जात असल्याची बाब एका पीएने आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. हा धोका लक्षात आल्याने अचानक काँग्रेसचे पाचही आमदार सक्रिय झाले. त्यांनी २२ कोटींच्या या निधीचे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात आपल्या स्तरावरूनच नियोजन करण्याचा निर्णय घेतला. सातही आमदारांना प्रत्येकी तीन कोटी रुपये मिळाले. अन्य पाच ते सहा कोटींच्या निधीतही असेच वाटप करण्यात आले. त्यामुळे अध्यक्षांनी जिल्हा परिषद सदस्यांकडून बोलविले प्रस्ताव आजही पडून आहे. ही राजकीय खेळी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्टÑवादी व शिवसेना सदस्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यात काही काँग्रेसचे सदस्यही नाराज झाले. आमदारांनी केलेल्या या आर्थिक हस्तक्षेपाचा हिशेब आता विधानसभा निवडणुकीत चुकता करण्याचा निर्धार काही सदस्यांनी बोलून दाखविला. विशेषत: काँग्रेसचे आमदार असलेले वणी, केळापूर, राळेगाव, यवतमाळ व उमरखेड हे पाच मतदारसंघ या सदस्यांचे टार्गेट राहणार आहे. काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष असलेले आमदार वामनराव कासावार यांच्यासमोर चौफेर आव्हान आहे. त्यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे पाच जिल्हा परिषद सदस्य, भाजपा व मनसेचे प्रत्येकी एक सदस्य तर काँग्रेसचे केवळ दोन सदस्य आहे. आजपर्यंत वामनराव कासावारांचा विजय हा केवळ मतविभाजनामुळे झाला आहे. या निवडणुकीत संजय देरकर फॅक्टर त्यांच्यासाठी फार उपयोगी पडेल असे चित्र नाही, हे लोकसभेतील भाजपच्या ‘लिड’ने स्पष्ट झाले आहे. केवळ शिवसेनेतील दावेदारांची महत्वाकांक्षा कुठपर्यंत कायम राहाते एवढीच एक आशादायी बाब कासावारांसाठी आहे.