तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा

By Admin | Updated: January 31, 2015 23:28 IST2015-01-31T23:28:16+5:302015-01-31T23:28:16+5:30

शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.

Young people should do farming profession | तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा

तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा

शिवाजीराव मोघे : आर्णी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा
आर्णी : शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणेकरून प्रगती होईल शिवाय रोजगारही मिळेल, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.
यवतमाळ जिल्हा विकास मंचद्वारा आयोजित कृषीपूरक व्यवसाय मार्गदर्शन व कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसायासाठी भरपूर संधी आहेत. जिल्हा विकास मंच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे अ‍ॅड. मोघे यांनी सांगितले.
भारत राठोड यांनी प्रास्ताविकातून शेतकऱ्यांना यशस्वी उद्योजकांकडून प्रेरणा मिळावी असे सांगितले. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय त्यांनी करावा, असे ते म्हणाले. प्रसंगी राजाभाऊ ठाकरे, जीवन पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी डी.आर. कलसाईत आदींनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात यशस्वी शेतकऱ्यांनी आपल्या यशाचे गमक सांगितले. डाळिंबाचे उत्पादक कुलदीप राऊत (मंगरूळपीर) म्हणाले, शेतीतून चांगले उत्पादन घेता येते. मात्र यात स्वत:ला झोकून देण्याची गरज आहे. शेताशी एकरूप झाल्यास शेतकरी कधीही मागे येणार नाही. शेतीच्या धुऱ्याचाही उपयोग करून उत्पादनात वाढ करता येते. आपण डाळिंबाची झाडे लावल्यापासून दिवसभरातील एकवेळचे जेवण शेतातच घेतो, असे ते म्हणाले.
कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे देवेंद्र भोयर म्हणाले, आपण व्यवसायात चढउतार पाहिले. खूप नुकसान झाले. परंतु हिम्मत सोडली नाही. दरम्यान बीपीएडही केले. बँकेने दिलेली नोकरी नाकारून त्यांच्याकडून कर्ज घेतले. यातून व्यवसाय वाढविला. चुकांमधून शिकत गेलो आणि उभारी मिळत गेली. कोंबड्यांना लागणारे खाद्य स्वत: बनविण्याचे तंत्र अवगत केले. यातून खूप फायदा झाला. परिश्रमाच्या बळावरच आज स्वत:मध्ये विश्वास निर्माण झाला. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे निश्चितच वळले पाहिजे, असे ते म्हणाले. दुग्ध व्यावसायिक अरविंद भेंडे यांनी शेतात केलेल्या विविध प्रयोगातून सर्वांगीण प्रगती साधली आहे. भाजीपाल्यासाठी शेडनेटचा प्रयोग केला. काकडी, टोमॅटो आदी भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतले. सोबत दुग्ध व्यवसाय सुरू केला. पॅकेजमधून मिळालेल्या जनावरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून दुग्ध उत्पादनात वाढ केली. प्रत्येक शेतकऱ्याने जोडधंदा करावा, असे मत त्यांनी मांडले. या कार्यशाळेप्रसंगी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने हजेरी होती. बहुतांश शेतकऱ्यांनी प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. यात बचत गटाच्या महिलांचाही सहभाग होता. कार्यशाळेप्रसंगी डॉ. प्रमोद यादगीरवार, जिल्हा विकास मंचचे भारत राठोड, महेंद्र ढवळे, राजेंद्र वानखडे, जी.जी. पिंगळे, कैलास राऊत, राजेंद्र बुटले आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Young people should do farming profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.