होय, काँग्रेस नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला
By Admin | Updated: May 23, 2014 00:13 IST2014-05-23T00:13:32+5:302014-05-23T00:13:32+5:30
काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली,

होय, काँग्रेस नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला
आमदार-पदाधिकार्यांची कबुली : लोकसभेतील पराभवाची मुंबईत कारणमीमांसा
यवतमाळ : काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली, अशा शब्दात जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी मुंबईत कबुली दिली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे ९२ हजार मतांनी पराभूत झाले. काँग्रेसचा बालेकिल्ला असताना शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या. विशेष असे काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातच शिवसेनेला सर्वाधिक मते मिळाली. या पार्श्वभूमीवर मोघेंच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी बुधवार २१ मे रोजी मुंबईत जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार व प्रमुख पदाधिकार्यांची बैठक बोलविण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे असताना काँग्रेस उमेदवाराचा लोकसभेत पराभव का झाला याच्या कारणांवर चर्चा झाली. प्रत्येक आमदार व पदाधिकार्यांनी आपली बाजू मांडली. त्यात प्रकर्षाने कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय पुढे आला. काँग्रेसमध्ये वर्षानुवर्षे विशिष्टच लोक मंत्री, आमदार, पदाधिकारी राहत आहे. त्यांच्या खात्यातही बदल होत नाही. आपला वारसा कार्यकर्त्याकडे सोपविण्याऐवजी घरातीलच व्यक्तीकडे सोपविला जातो. पक्षात संपर्क राहिला नाही, पक्षातील प्रवाह जणू थांबला आहे. वरचे लोक वर आणि खालचे कार्यकर्ते खाली अशी स्थिती आहे. पक्षात नव्याने येणार्यांची संख्या थांबली आहे. काही विशिष्ट लोकांनी आपल्या जागा फिक्स केल्या आहेत, आदीबाबी चर्चेतून पुढे आल्या. उपस्थित आमदारांनीही ही कारणे मान्य केली. काँग्रेसच्या पराभवाला खिळखिळे झालेले पक्ष संघटन यासोबतच भाजपासोबत राहिलेला मीडिया, त्याचा ग्रामीण मतदारांवर पडलेला प्रभाव, सत्तेतील सहकारी पक्ष राष्टÑवादी काँग्रेसने काम न केल्याबाबत अनेक भागातून आलेल्या तक्रारी हीसुद्धा कारणे तेवढीच महत्वाची ठरल्याचे सांगितले गेले. या सर्व तक्रारी व पराभवाची कारणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. पराभवाच्या कारणांचा फार विचार न करता सकारात्मक दृष्टीने विधानसभा निवडणुकांची तयारी करा, असा सल्ला वजा आदेश ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत, मात्र त्याची जनजागृती व अंमलबजावणी झाली नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शेतकरी, कर्ज, व्याजदर, अनुदानाच्या लाभार्थ्यांना अद्यापही न मिळालेल्या रकमा, कापसाचे दर, सिंचन, अन्न सुरक्षा योजना, जीवनदायी योजना यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. लोकसभेत पराभव झाला मात्र आता विधानसभेचा विचार करा, भविष्यात काय करायचे हे ठरवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार व पदाधिकार्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)