यवतमाळात भाजपाचा नव्या चेहऱ्यावर भर
By Admin | Updated: August 26, 2014 23:43 IST2014-08-26T23:43:58+5:302014-08-26T23:43:58+5:30
भारतीय जनता पक्षात यावेळी ‘इलेक्टीव्ह मेरिट’वर उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळेच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नव्या चेहऱ्यावर भर दिला जात आहे.

यवतमाळात भाजपाचा नव्या चेहऱ्यावर भर
विधानसभा निवडणूक : तीन मतदारसंघात जुन्यांचीच चाचपणी
यवतमाळ : भारतीय जनता पक्षात यावेळी ‘इलेक्टीव्ह मेरिट’वर उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळेच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नव्या चेहऱ्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यातील सात पैकी राळेगाव, आर्णी, यवतमाळ आणि उमरखेड हे चार मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहेत. या चारही मतदारसंघात पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी जुन्याच नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. भाजपात आतापर्यंत शिफारसींवर उमेदवारी दिली जात होती. परंतु आता निवडून येण्याची क्षमता, सर्वेक्षण याबाबी महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. चेहरा जुना असेल तर खरोखरच तो निवडून येऊ शकतो का याची चाचपणी पक्ष वेगवेगळ्या एजंसीमार्फत करीत आहे. या सर्वेक्षणातून बरेच चित्र स्पष्ट होत असून त्याबाबत भाजपाच्या गोटात नेत्यांमध्ये चर्चाही ऐकायला मिळते. त्यानुसार आर्णी, राळेगाव आणि उमरखेड या तीन मतदारसंघात पुन्हा एकदा जुन्यांपैकीच उमेदवारांना मैदानात उतरविण्याचा विचार भाजपा श्रेष्ठी करीत असल्याचे बोलले जाते. यवतमाळात मात्र नव्या चेहऱ्याला वाव आहे. यापूर्वी निवडणूक लढविल्याचा अनुभव असलेल्या भाजपातील दोनही उमेदवारांची नावे मागे पडली आहे. तिसऱ्याच आणि पक्षासाठी नव्या असलेल्या उमेदवाराच्या नावावर भर दिला जात आहे. वास्तविक या उमेदवारानेही एकदा विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु त्यावेळी ते पक्षात नव्हते, हे विशेष. त्यामुळेच त्यांच्या नावावर चर्चा थांबलेली आहे. भाजपातील प्रबळ दावेदार उमेदवाराचे भविष्यात महायुतीची सत्ता आल्यास महामंडळावर पुनर्वसन करण्याबाबत शब्द दिला जाणार आहे. उमेदवारी कुणालाही मिळो, सर्वांनी एकोप्याने पक्षाचे काम करावे हाच श्रेष्ठींचा आदेश आहे. वास्तविक नवा चेहरा म्हणून ज्या उमेदवाराकडे पक्षश्रेष्ठी पाहत आहे, त्याचीही पूर्वीसारखी पकड राहिलेली नाही. पोटनिवडणुकीत प्रबळ दावेदाराला त्याचा अनुभवसुद्धा आला आहे.
आर्णी मतदारसंघात एका नेत्याने आपल्या पक्ष प्रवेशाच्या अटीवर नवख्या उमेदवाराचे नाव रेटण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र श्रेष्ठींना त्यांच्या अटी मान्य नाही. प्रदेश नेत्यांशी बोलून पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. तेथे श्रेष्ठींकडून डॉक्टरची नाडी तपासली जाणार आहे.
राळेगाव मतदारसंघात काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी विरोधी पक्षाने सर्व मिळून एकच उमेदवार देण्याचा विचार चालविला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा प्राध्यापकाचा विचार केला जात आहे.
उमरखेडमध्येसुद्धा भाजपाच्या उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा असली तरी मागचाच उमेदवार कायम असल्यास काय स्थिती राहू शकते, याचा आढावा पक्षाकडून घेतला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)