लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उद्योग-व्यवसायाला गती मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील ही भावना यवतमाळ येथील विमानतळाच्या उभारणी मागे होती. मात्र, येथील जवाहरलाल दर्डा विमानतळ मागील दीर्घ कालावधीपासून उपेक्षित राहिले. त्यामुळे येथील व्यवसाय-उद्योगाला जो फायदा मिळायला हवा होता, तो मिळाला नाही. विकासासाठी यवतमाळकरांना ताटकळत राहावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या नेमक्या भावना समजून घेत विमानतळ कार्यान्वित करण्यासह यवतमाळला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे ठाम आश्वासन डॉ. विजय दर्डा यांना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांच्या नागपूर येथील 'यवतमाळ हाऊस' येथे भेट दिली. यावेळी डॉ. दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यवतमाळ येथील विमानतळाच्या दुरवस्थेचा प्रश्न मांडला. तसेच विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आग्रहाची विनंती केली. विमानतळाची धावपट्टी सध्या २१०० मीटर आहे. यावर ७० आसन क्षमता असलेले एटीआर विमान दिवसा उतरविता येते. ही धावपट्टी २४२० मीटरपर्यंत वाढविली तर बोईंग विमान दिवसा उतरविता येऊ शकते. आवश्यक वीज यंत्रणा बसविल्यास नाईट लँडिंगची सुविधाही उपलब्ध होऊ शकते.
या बरोबरच विमानतळावरील कंट्रोल पॉवर बिल्डिंगसह टर्मिनल बिल्डिंग तसेच अॅप्रोल एरिया विकसित करण्यासह अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्याच्या मुद्याकडे डॉ. दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. विमानतळ सुसज्ज झाल्यास याचा उपयोग पायलट प्रशिक्षणासाठी (एव्हिएशन एज्युकेशन) होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. यवतमाळच्या विमानतळाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, त्याची काळजी करू नका, यवतमाळच्या विकासाचा शब्द मी दिला आहे, तो पाळला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर डॉ. विजय दर्डा यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही आठवण करून दिली की, यवतमाळच्या विमानतळाकडे जातीने लक्ष देणार असल्याचे आपण कबूल केले होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उदय सामंत यांनी यवतमाळचे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेण्याची आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल डॉ. दर्डा यांनी त्यांना धन्यवादही दिले. यावर उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, यवतमाळच्या विमानतळासंबंधी आमची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. तुमच्या मागणीप्रमाणे विमानतळाच्या विकासाचे संपूर्ण काम आम्ही करणार आहोत.
हाच विषय उद्योगमंत्री सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला असता, यवतमाळच्या विमानतळाला बाबूजींचे नाव दिलेले आहे, त्यामुळे या विमानतळाच्या विकासाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
'एमएडीसी'कडे ताबा आल्याने वाढल्या अपेक्षा
उद्योगमंत्री असताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी राज्यातील मागास जिल्ह्यात औद्योगीकरण वाढविण्यासाठी संबंधित जिल्ह्यात विमानतळाची गरज व्यक्त करून तसे धोरण आणले होते. यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापसाची २ पंढरी अशी आहे. यवतमाळ येथे हवाईसेवा सुरू झाल्यास उद्योग-व्यवसायाला गती मिळेल, या अपेक्षेने बाबूजींनी कठोर परिश्रम घेऊन यवतमाळमध्ये हे विमानतळ उभारले.
प्रारंभी महाराष्ट्र औद्योगिक विकास 5 महामंडळाकडे असलेले हे विमानतळ २००९ मध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हल्पमेंटकडे गेले. मात्र, रिलायन्सकडून देखभाल-दुरुस्तीसह विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने तब्बल १५ वर्षांनंतर राज्य शासनाने हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेतले. त्यानंतर ८ एप्रिल २०२५ पासून हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे. आता हे विमानतळ कधी कार्यान्वित होते, याची यवतमाळकरांना उत्सुकता लागली आहे.
Web Summary : CM assures Yavatmal airport revival, boosting business and jobs. Dr. Darda highlighted the need for upgrades, including runway extension and night landing facilities. The government aims to develop the airport, potentially for pilot training, fulfilling Babuji's vision for regional growth.
Web Summary : मुख्यमंत्री ने यवतमाल हवाई अड्डे के पुनरुद्धार का आश्वासन दिया, जिससे व्यापार और नौकरियों को बढ़ावा मिलेगा। डॉ. दर्डा ने रनवे विस्तार और रात्रि लैंडिंग सुविधाओं सहित उन्नयन की आवश्यकता पर प्रकाश डाला। सरकार का लक्ष्य हवाई अड्डे को विकसित करना है, संभवतः पायलट प्रशिक्षण के लिए, क्षेत्रीय विकास के लिए बाबूजी के दृष्टिकोण को पूरा करना।