यवतमाळची बाजारपेठ तब्बल ५० दिवसानंतर उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:33+5:30
२२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.

यवतमाळची बाजारपेठ तब्बल ५० दिवसानंतर उघडली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. यवतमाळ शहर तर कोरोना रुग्णांमुळे थेट रेडझोनमध्ये आले. २२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्याने नागरिक ग्रामीण भागातून खरेदीसाठी आले होते.
आतापर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. नंतर शेतीपयोगी साहित्य व बी-बियाण्यांची दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने हार्डवेअर, सिमेंट ही दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत उघडण्याची मुभा दिली. रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यासंदर्भात दिवस ठरवून दिले आहे. त्याचा पहिला दिवस सोमवार होता. आज कापड दुकानांसह जनरल स्टोअर्स व इतरही दुकाने उघडण्यात आली.
जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेली दुकाने उघडली. नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. प्रत्येकजण तोंडाला मास्क बांधून होता. शक्यतोवर गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. काही दुकानदारांनी स्वत:हून सर्कल आखून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी पुढाकार घेतला होता.
शांत शहर गजबजले
एखाद्या युद्धाच्या परिस्थितीत जशी स्थिती निर्माण होते असाच काहीसा अनुभव गेल्या दीड महिन्यापासून यवतमाळकरांना आला. घराबाहेर पडले तरी कुणीच भेटत नव्हते. बाजारपेठही पूर्णत: शांत होती. चिरनिद्रेतून शहर जागे झाल्याचा आभास सोमवारी दुपारचे चित्र पाहून झाला.
बाजारपेठेसह आता बँकाही सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत चालणार
गत ५० दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ बंद होती. अत्यावश्यक सेवेची दुकाने १२ वाजेपर्यंत खुली होती. ही वेळ वाढवून आता दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने आणि बँकांचा व्यवहार सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. या उपाययोजनांच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये बाजारपेठ आळीपाळीने उघडण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहेत. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत उघडी राहणार होती. आता ही दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषत: बँकेसमोर होणारी गर्दी वाढलेल्या वेळेमुळे नियंत्रणात येणार आहे. यासोबतच दुकानातील गर्दीही थांबणार आहे.