यवतमाळ, दिग्रसचा उमेदवार दिल्लीतून !

By Admin | Updated: September 25, 2014 23:29 IST2014-09-25T23:29:56+5:302014-09-25T23:29:56+5:30

यवतमाळच्या महिला आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापता यावे म्हणून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट दिल्लीतून फिल्डींग लावली आहे. यवतमाळात पारवेकरांऐवजी मुलगा राहुलला

Yavatmal, Digras candidate from Delhi! | यवतमाळ, दिग्रसचा उमेदवार दिल्लीतून !

यवतमाळ, दिग्रसचा उमेदवार दिल्लीतून !

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची खेळी : स्वबळामुळे इच्छुकांची तारांबळ, सक्षम उमेदवारांची शोधाशोध, नामांकनाचा मुहूर्त
यवतमाळ : यवतमाळच्या महिला आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापता यावे म्हणून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट दिल्लीतून फिल्डींग लावली आहे. यवतमाळात पारवेकरांऐवजी मुलगा राहुलला तर दिग्रसमधून मोघे विरोधकाला उमेदवार म्हणून दिल्लीतून लादले जाणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात प्रदेश काँग्रेस विरुद्ध मुख्यमंत्री असा सामना पहायला मिळत आहे. त्यातूनच अनेकांवर अन्याय होतो आहे. यवतमाळ विधानसभेची उमेदवारी पुन्हा नंदिनी पारवेकरांना द्यावी, अशी मागणी असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ती थेट दिल्लीतून कापायला निघाले आहेत. नंदिनी यांना डावलून मुलगा राहुल ठाकरे यांच्यासाठी मैैदान साफ केले जात आहे. त्याच प्रमाणे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे हे माणिकरावांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात. म्हणून त्यांना शह देण्यासाठी माणिकरावांनी मोघे विरोधकांना आश्रय दिला आहे. मोघेंच्या एकेकाळच्या पीएला काँग्रेस उमेदवारी देऊन दिग्रस-दारव्हा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात बंजारा कार्ड म्हणून वापरणार आहे. या माध्यमातून मोघे व राठोड या दोघांवर निशाणा साधला जाणार आहे. यवतमाळ व दिग्रसचे उमेदवार दिल्लीतून स्थानिक मतदारांवर लादले जाणार आहे.
जिल्ह्यात माणिकराव विरुद्ध इतर असे चित्र काँग्रेसमध्ये पहायला मिळत आहे. पहिल्या यादीत वणी, राळेगाव, उमरखेड येथील उमेदवार जाहीर करून विद्यमान आमदारांना पुन्हा रिंगणात उतरविले गेले. त्याच प्रमाणे आर्णीमधून केवळ मोघेंचे नाव असताना त्यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर न करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. प्रदेशाध्यक्ष मोघें विरोधात सुडाचे राजकारण करीत असल्याचा सूर आदिवासी समाजातून ऐकायला मिळत आहे. यवतमाळात नंदिनी पारवेकरांना केवळ माणिकरावांचा विरोध आहे. ते पाहता माणिकराव हेतुपुरस्सर आदिवासी व अल्पसंख्यकांना तर ‘टार्गेट’ करीत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.
महायुती भंगली, आघाडीही त्याच मार्गावर असल्याचे स्पष्ट होताच विविध पक्षातील इच्छुकांनी मिळेल त्या चिन्हावर लढण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. राजकीय पक्षांवरही अचानक सक्षम उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कालपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेले काही चेहरे आज अचानक भाजपा-सेनेच्या बाजूला आले आहेत. हीच स्थिती युतीतील उमेदवारांची आघाडीबाबत झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणीमधून जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने ऐनवेळी इच्छुकांसह पक्षांचीही तारांबळ पहायला मिळत आहे. काहींनी एकाच वेळी अनेक तबले वाजविण्याचे प्रयत्नही चालविले आहे. यवतमाळात काँग्रेसतर्फे जीवन पाटील थेट मुख्यमंत्र्यांमार्फत फिल्डींग लावून आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीतील दादा गट काँग्रेसमध्ये आला असला तरी आमचा प्रवेश बिनशर्त असल्याचा दावा या गटाचे नेते मनीष पाटील यांनी केला आहे. स्वबळामुळे जवळपास सर्वच मतदारसंघात आता चौरंगी लढतीचे चित्र पहायला मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal, Digras candidate from Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.