यवतमाळ एसीबीची मोहीम थंडावली
By Admin | Updated: October 3, 2014 02:13 IST2014-10-03T02:13:11+5:302014-10-03T02:13:11+5:30
जानेवारी ते जून या सहा महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेगाने ट्रॅप केले असले तरी सध्या ही मोहीम जणू थांबल्याचे दिसत आहे.

यवतमाळ एसीबीची मोहीम थंडावली
यवतमाळ : जानेवारी ते जून या सहा महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेगाने ट्रॅप केले असले तरी सध्या ही मोहीम जणू थांबल्याचे दिसत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या मार्गदर्शनात राज्यभर धुमधडाका चालविला. या मोहिमेचा सर्वांनीच धसका घेतला. गेल्या आठ महिन्यात यवतमाळ एसीबीने २४ ट्रॅप यशस्वी केले. मात्र एसीबीच्या या कामगिरीवरही महासंचालक दीक्षित समाधानी नसल्याचे त्यांच्या २५ सप्टेंबर २०१४ च्या एका पत्रावरून दिसून येते. जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस, महागाव, बाभूळगाव, कळंब, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव या आठ तालुक्यांमध्ये जानेवारी २०१४ पासून एकही ट्रॅप यशस्वी न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात एसीबीचा ट्रॅप नाही. ते पाहता एसीबीच्या यंत्रणेमध्ये शिथिलता आल्याचे दिसून येते. आठ तालुके आता एसीबीच्या निशाण्यावर राहणार आहे. एसीबीची थंडावलेली मोहीम लक्षात घेता लोकांनी लाचखोरांविरुद्ध तक्रारी करणे बंद केले की पुन्हा लिकेजेस वाढले, याबाबत शंका येऊ लागली आहे. तक्रारी नसेल तर एसीबी स्वत:हून पुढाकार घेऊन रनिंग ट्रॅप का करीत नाही, हा प्रश्न आहे. कारण खाकी वर्दीतील कित्येक माणसे गावाबाहेर सर्वांच्या डोळ्यादेखत लाच घेताना दिसतात. (जिल्हा प्रतिनिधी)