यार्डावर व्यापाऱ्यांचा ताबा
By Admin | Updated: May 14, 2014 02:02 IST2014-05-13T23:59:36+5:302014-05-14T02:02:17+5:30
शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये महिनोगणती व्यापाऱ्यांचाच माल पडून राहतो.

यार्डावर व्यापाऱ्यांचा ताबा
आरिफ अली - बाभूळगाव
शेतकर्यांसाठी तयार करण्यात आलेल्या बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये महिनोगणती व्यापार्यांचाच माल पडून राहतो. त्यामुळे बाजार समिती शेतकर्यांसाठी की व्यापार्यांसाठी असा प्रश्न संतप्त शेतकर्यांमधून विचारला जात आहे. शेतकर्यांचा माल मात्र उघड्यावर असलेल्या धान्य ओट्यावर ठेवावा लागत असल्यामुळे बाजार समिती कोणाचे हित जोपासते, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
जिल्हय़ाचे ठिकाण असलेल्या यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कळंब व बाभूळगाव या दोन बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला होता. सन १९९0 मध्ये जवाहरलाल दर्डा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री असताना त्यांनी बाभूळगाव तालुक्यातील शेतकर्यांची अडचण लक्षात घेऊन यवतमाळ बाजार समितीपासून बाभूळगाव व कळंब या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्या वेगवेगळ्या केल्या. बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची भव्य इमारतही उभी करण्यात आली.
येथील बाजार समितीमध्ये तालुक्यातीलच नव्हे तर इतरही तालुक्यातील शेतकरी आपला कृषीमाल विक्रीसाठी आणतात. याठिकाणी मोठमोठे चार टिन शेड बांधलेले आहेत. तर पाच सिमेंट ओट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हे टिनशेड तालुक्यातील शेतकर्यांच्या कुठल्याही उपयोगात येताना दिसत नाही. या शेडमध्ये व्यापार्यांनी खरेदी केलेल्या धान्याचे पोते ठेवले जातात. पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकर्यांना मात्र आपला माल सिमेंटच्या ओट्यावर ठेवावा लागतो. याच ठिकाणी लिलाव केला जातो. मात्र अचानकपणे पाऊस आला तर शेतकर्यांची मात्र मोठी तारांबळ उडते.
बाभूळगाव बाजार समितीने ५0 च्यावर व्यापार्यांना परवाने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र तीन ते चारच व्यापारी खरेदी करताना दिसतात. १0 फेब्रुवारी २0१४ पासून बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने येथे धरमकाटा बसविण्यात आला आहे. तसेच बैलबाजारही सुरू करण्यात आला आहे. बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यापासून धान्य विक्री, लिलावाचे दिवस वाटून देण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळ व बुधवार या तीन दिवसात सोयाबीनचा लिलाव तर गुरुवार व शुक्रवार हे दिवस तूर व चना खरेदीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.