पक्षपाती धोरणाला कामगार वैतागले
By Admin | Updated: August 13, 2015 03:10 IST2015-08-13T03:10:27+5:302015-08-13T03:10:27+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात पक्षपाती धोरण राबविले जात आहे.

पक्षपाती धोरणाला कामगार वैतागले
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात पक्षपाती धोरण राबविले जात आहे. मर्जीतील कामगारांना सोयीच्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या ड्युटीवर पाठविले जात आहे. या प्रकारात अनेक कामगारांवर अन्याय होत आहे. याविषयी तक्रार केल्यानंतरही संबंधितांवर विभाग नियंत्रकांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे पक्षपात करणाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे.
आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या यवतमाळ आगाराला विविध प्रश्नांनी ग्रासले आहे. अशातच वरिष्ठांकडून कनिष्ठ कामगारांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. मर्जीतल्या व्यक्तीची ड्युटी लावण्यासाठी इतरांवर अन्याय केला जात आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबत नाही तर काही कामगारांवर छोट्या छोट्या कारणांसाठी दंडही लावला जात आहे. बसस्थानक प्रमुख आणि वाहतूक निरीक्षक यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे.
एकाच कामगारावर वारंवार दंड लावून त्यांचा मानसिक छळ होत आहे. वाहतूक निरीक्षक आणि बसस्थानक प्रमुखांच्या मनमानी धोरणामुळे बसफेऱ्या रद्दचेही प्रकार होत आहे. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान एसटीला होत आहे. प्रवाशांची गैरसोय झाली ती वेगळीच. मर्जीतील चालक-वाहकांना टी-९ प्रमाणे लांबपल्ल्याची कामगिरी आल्यास परस्पर बदलून दिली जाते किंवा वेळेवर अर्जसुद्धा स्वीकारला जातो. मात्र इतरांना जाणीवपूर्वक त्रस्त करून सोडले जाते. रजेचा अर्ज न स्वीकारणे, जाणिवपूर्वक लांब पल्ल्याच्या कामगिरीवर लावणे या प्रकारातून होणारा मानसिक त्रास असह्य होत चालला आहे. ही बाब विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही आगारातील अधिकाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप आहे. यवतमाळ आगारात कामगारांशी दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यत झालेल्या आहेत. काही प्रकरणात चौकशीही सुरू झाली आहे. याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. या परिस्थितीत महामंडळाच्या वरिष्ठांनी दुजाभाव होण्याचा प्रकार थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
विशिष्ट लोकांकडून चूक झाली तरी त्यांच्यावर कारवाईतही चालढकल केली जात आहे. अशी अनेक प्रकरणे जिल्ह्याच्या विविध आगारामध्ये घडली आहे. शिवाय कित्येक प्रकरणांमध्ये कारवाईसाठी टाळाटाळ केली जाते. शेकडो प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आगारातून सोडल्या जाणाऱ्या बहुतांश फेऱ्या विलंबाने जाण्याचे प्रकारही घडत आहे. (वार्ताहर)