महिलांच्या डोक्यावर हंडा

By Admin | Updated: August 22, 2014 00:09 IST2014-08-22T00:09:01+5:302014-08-22T00:09:01+5:30

निसर्गाचा असमतोल, लहरी पाऊस आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे अपयश, यामुळे पुसद तालुक्यात पावसाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Women's scalp | महिलांच्या डोक्यावर हंडा

महिलांच्या डोक्यावर हंडा

पावसाळ्यात पाणीटंचाई : पूस धरणात १६ टक्के जलसाठा
पुसद : निसर्गाचा असमतोल, लहरी पाऊस आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे अपयश, यामुळे पुसद तालुक्यात पावसाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही महिलांच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्याचे आझे कमी झाले नाही. यंदा तर अल्प पावसाने सर्वाच्या तोंडचे पाणी पळाले असून पुस धरणातही केवळ १६ टक्के जलसाठा आहे. परिणामी टंचाईची स्थिती आणखी दाहक होण्याची चिन्हे आहे.
गेल्या वीस वर्षाचा आढावा घेतला तर पर्जन्यमानात सातत्य राहिलेले नाही. सरासरी एवढाही पाऊस होत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले, विहिरी, हातपंप कोरड्या पडतात.
यावर्षी तर पुसद तालुक्यावर वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने १९ आॅगस्टपर्यंत केवळ १७० मिमी एवढाच पाऊस झाला. तालुक्यातील लहान-मोठ्या तलावातील पाणी आटले आहेत. पूस धरणात सुमारे १६ टक्के जलसाठा आहे. शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले. तरीही भयावह परिस्थिती आहे. आगामी उन्हाळ्यात पुसद शहराला टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागेल अशी वेळ येऊ शकते. उन्हाळ्यात पाणी पातळी खोल जात असते पण यावर्षी पावसाळ्यातच झळ सोसावी लागत आहे.
दरवर्षी प्रशासकीयस्तरावर पाणीटंचाई निवारण करण्याच्या अनुषंगाने विंधन विहिरी, नळयोजना, अनुदानावर विहिरी यावर लाखो रुपये खर्च केला जाते. पण त्या विहिरी कुणाला मिळाल्या त्यापैकी किती विहिरींना पाणी लागले किंवा नाही किती कोरड्या आहेत व त्याची कारणे शासकीय यंत्रणेने कधी चौकसपणे तपासणी केली का ? असे अनेक प्रश्न पाणीटंचाई अनुषंगाने निर्माण होतात.
राज्य सरकार जलस्वराज्य, भारत निर्माण सारख्या योजना राबविते. मात्र मुळात जमिनीच्या पोटात पाणी नसल्यामुळे या योजना निष्क्रीय ठरतात. पुसद शहरासह तालुक्यात आठ ते दहा हजार विंधन विहिरीद्वारे व सात हजार विहिरींद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. ग्रामीण भागात शेती सिंचनासाठी तर शहरी भागात सांडपाणी आणि पिण्यासाठी पाणी उपसले जात आहे. पावसाळ्यात एक मीटर पाणी मुरण्यासाठी शंभर तास ते शंभर दिवस एवढा कालावधी लागतो. मात्र एवढ्या पाण्याचा उपसा केवळ अवघ्या काही तासात केला जात आहे.
यामुळेच पाण्याची भीषणता निर्माण होऊ लागली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंंबासाठी झगडावे लागणार असल्याची शक्यता यावरून दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women's scalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.