तलाठी साजे इमारतीविना
By Admin | Updated: September 15, 2014 00:25 IST2014-09-15T00:25:58+5:302014-09-15T00:25:58+5:30
स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात.

तलाठी साजे इमारतीविना
मारेगाव : स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात. मात्र तालुक्यातील बहुतांश तलाठी साजे व मंडळ कार्यालयांना स्वत:च्या मालकीची सुरक्षित वास्तूच नसल्याने महत्वाचे दस्तऐवज वाऱ्यावर आहे़ या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्ष दिले नाही़
ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीपासून देशात तलाठी साजे अस्तित्वात आहे़ तलाठी साजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ कार्यालये असतात. तालुक्यातील १०९ गावांसाठी तलाठ्यांचे ३१ साजे आहेत. या ३१ साजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात कुंभा, बोटोणी, मार्डी, मारेगाव व वनोजादेवी असे एकूण पाच मंडळ कार्यालये प्रशासनाने निर्माण केले आहे़ परंतु यातील तीन तलाठी साजे सोडून २८ साजे व पाच मंडळ कार्यालयांना अद्याप स्वत:च्या मालकीची इमारतच नाही़
महसूल यंत्रणेतील तलाठी हा शेवटचा घटक आहे़ गावपातळीवर शेती संदर्भातील दप्तर सांभाळण्यासह इतरही अनेक महत्वाची कामे तलाठी साजातून होतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे पद अस्तित्वात आहे़ तरीही तलाठी साजांना अद्याप स्वत:ची हक्काची वास्तू मिळाली नाही़ इतरांना जागा उपलब्ध करून देणारे तलाठी साजेच स्वत: मात्र जागेअभावी उपेक्षित आहेत. तलाठी कार्यालये बांधावे, यासाठी कुणी आवाज उठविला, असेही आजपर्यंत कधी घडले नाही़ त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्षच दिले नाही़
या बाबीसंबंधात तहसील प्रशासनाकडून अधिक माहिती जाणून घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. त्यात केवळ तालुक्यातील सगनापूर, मारेगाव, जळका या तीन गावातील साजांना स्वत:च्या मालकीच्या इमारती असल्याची माहिती मिळाली़ त्यातही जळका येथील इमारत जीर्ण झाल्याने ती नादुरूस्त आहे़ तालुक्याचे ठिकाण असलेल्या मारेगाव साजाची इमारत जुन्या काळातील चावडी आहे़ पाचपैकी एकही मंडळ कार्यालय स्वत:च्या मालकीच्या इमारतीत नाही़
नवरगाव, कोलगाव, करणवाडी, नरसाळा, कुंभा, चिंचाळा या सहा साजांनी भाड्याच्या वास्तू कार्यालयासाठी घेऊन भाडे काढल्याची नोंद आहे़ उर्वरित साजे व मंडळ कार्यालये यांचे महत्त्वाचे दस्तऐवज एक तर गावात कुणाच्या घरी ठेवलेले असते, किंवा बहूतांश महत्वाचे दस्तऐवज तलाठी व मंडळ अधिकारी घेऊन जातात, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली़ शासनाचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज हस्तांतरित होत असताना, या गंभीर प्रकाराकडे कुणीच लक्ष देत नाही़ बऱ्याच तलाठ्यांनी आपल्या घरीच साजा कार्यालये थाटली आहे़
या दस्तऐवजाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने बरेचदा तलाठी फेरफार नोंद, वारस चढविणे, वारस कमी करणे, शेतीचे क्षेत्रफळ ठरविणे, गट सर्वे नंबर बनविणे आदी कामांसाठी मोठा मोबदला मागतात, अशी शेतकऱ्यांकडून नेहमी ओरड होते. जवळ-जवळ सर्व तलाठी व मंडळ अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याबाहेर राहतात, ही सुद्धा वस्तुस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)