निर्मलग्रामसाठी हवा बुस्टर डोज
By Admin | Updated: December 20, 2015 02:38 IST2015-12-20T02:38:13+5:302015-12-20T02:38:13+5:30
स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबांबाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत राज्य शासनाने निर्मलग्राम योजना हाती घेतली.

निर्मलग्रामसाठी हवा बुस्टर डोज
बीडीओंचे दुर्लक्ष : अभियानाकडे आठ तालुक्यांची पाठ, १२१ गावांचा आदर्श कागदावरच
यवतमाळ : स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबांबाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत राज्य शासनाने निर्मलग्राम योजना हाती घेतली. प्रारंभी चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बक्षीस मिळताच या गावांचा उत्साह मावळला आहे. इतकेच नव्हेतर, आता स्वच्छतेसाठी नवीन गावे पुढे येण्यास तयार नाहीत. या गावांना बुस्टर डोज देण्यासाठी जिल्हा परिषदेने नवे पाऊल उचलले आहे.
संपूर्ण जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर असावा म्हणून जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या काळात जोमाने काम झाले. त्यांची बदली होताच कामाची गती मंदावली. यानंतर या कामांना गती मिळावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पुढाकार घेतला. मात्र गटविकास अधिकारी याबाबत उत्सुक नसल्याचे दिसते. २००६ ते २०११ पर्यंत जिल्ह्यात १२१ गावे निर्मलग्राम म्हणून जाहीर झाले. त्या गावांना पुरस्कार मिळाला. नंतरच्या काळात या गावात मोठे फेरबदल झाले. पुरस्कार मिळाल्यानंतर ७० टक्के गावे पूर्वपदावर आली आहेत. या गावांना नव्याने स्वच्छतेचा मंत्र देण्याची गरज निर्माण झाली आहे. या योजनेचे आता हागणदारीमुक्त ग्राम असे नामकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी केवळ आठ तालुक्यांतील ११ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. (शहर वार्ताहर)
आठ तालुक्यातील यंत्रणा ढिम्म
हागणदरीमुक्त ग्राम योजनेकडे आठ तालुक्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामध्ये उमरखेड, दारव्हा, नेर, मारेगाव, महागाव, कळंब, घाटंजी आणि दिग्रस तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यातील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि इतर यंत्रणा उदासीन आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
जिल्ह्यातील चार लाख ७० हजार कुटुंबांपैकी दोन लाख ५८ हजार कुटुंबांकडे शौचालये बांधण्यात आली आहेत. तर दोन लाख २२ हजार ५२ कुटुंबांकडे शौचालयेच नाही. या कामाला गती देण्यासाठी गावपातळीवर जाणीवजागृतीसाठी प्रशासनाला वेगाने काम करावे लागणार आहे. रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशनमधून नागरिकांना शौचालयासाठी १२ हजार रूपयांचा निधी मिळणार आहे.
जिल्ह्यात स्वच्छतेचा शंखनाद करण्यासाठी जनजागृती समितीसह जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. ही समिती गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीला शेंडगाववरून प्रारंभ करणार आहे. पदयात्रा जाणीवजागृतीसाठी ५१ गावांना भेटी देणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वात ४० किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. बाभूळगाव तालुका गोदरीमुक्त करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यात स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.