जुने जलसाठे पुनर्जीवित करणार
By Admin | Updated: April 20, 2016 02:35 IST2016-04-20T02:35:24+5:302016-04-20T02:35:24+5:30
पाणीटंचाईची गंभीर स्थिती लक्षात घेता तालुक्यातील जुने जलसाठे पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

जुने जलसाठे पुनर्जीवित करणार
जलभूमी संधारण अभियान : कर्मचाऱ्यांची दीड लाखाची वर्गणी
पुसद : पाणीटंचाईची गंभीर स्थिती लक्षात घेता तालुक्यातील जुने जलसाठे पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत तालुक्यात या कामाला प्रारंभ झाला. कारला-उपनवाडी येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत जुने पाणीसाठे पुनर्जीवित करण्यात येत आहे. पुसद तालुक्यातील कारला, उपनवाडी येथे काम सुरूही करण्यात आलेले आहे. नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल एक लाख ४० हजार रुपयांची वर्गणी गोळा केली आहे.
पुसद तालुक्यातील कारला, उपनवाडी पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे होत्या. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तालुका कृषी अधिकारी पी.एन. राठोड, अभियंता सुभाष कासेटवार, भाऊ भुन्नाडे, पंचायत समिती सदस्य आशा पांडे, अवधूत मस्के, कृषी अधिकारी एस.के. राठोड, सरपंच, उपसरपंच, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानांतर्गत जुने पाणीसाठे पुनर्जीवित करण्यासाठी गाळ काढणे व सुपीक गाळ शेतात पसरविण्यात येणार आहे. गाळ काढणाऱ्या मशीनसाठी डिझेल व आॅईलची तरतूद या अभियानांतर्गत आहे. जेसीबी मशीनच्या भाड्यापोटी तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी एक लाख ४० हजारांची वर्गणी गोळा करून नवा पायंडा पाडला आहे. शेतकऱ्यांनी स्वत: ट्रॅक्टर लावून मोफत गाळ घेवून जावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)