घाटंजी तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:11+5:30
शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.
शेतकरी पिकांची राखण करून आता उत्पन्न घेण्याच्या मार्गावर आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुक्कर व रोहींमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आमडी येथील संजय मानकर यांच्या शेतात तर रानडुकरे व इतर वन्यप्राण्यांनी कपाशीचे प्रचंड नुकसान केले. त्यांनी वन व कृषी विभागाकडे दाद मागितली असता, अल्पशी मदत मिळाली. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
मदतीस विलंब
पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वन विभाग, तहसील व कृषी विभागामार्फत एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती नुकसानीची पाहणी करते. नंतर अहवाल सादर केला जातो. मात्र या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी समितीच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.