कधी फिटेल अंधाराचे जाळे
By Admin | Updated: May 15, 2016 02:00 IST2016-05-15T02:00:15+5:302016-05-15T02:00:15+5:30
गेल्या दीड महिन्यापासून वणी शहर उजेड-अंधाराच्या सापसिडी खेळात भरडले जात आहे. मात्र नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक, ...

कधी फिटेल अंधाराचे जाळे
नगरपरिषद निगरगट्ट : वणी शहर अद्याप अंधारातच, तरी सारेच आहे बिनधास्त
वणी : गेल्या दीड महिन्यापासून वणी शहर उजेड-अंधाराच्या सापसिडी खेळात भरडले जात आहे. मात्र नगरपरिषद पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांना त्याचे काहीच देणे-घेणे दिसून येत नाही. त्यामुळे ‘कधी फिटेल अंधाराचे जाळे’, असे म्हणण्याची वेळ वणीकरांवर आली.
शहरातील पथदीवे देखभाल व दुरूस्तीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर सुरू आहे. यावर्षीची कंत्राटाची मुदत गेल्या ३१ मार्च रोजी संपली होती. त्यापूर्वीच नवीन निविदा काढून हे काम कंत्राटदाराकडे सोपविणे आवश्यक होते. मात्र मुख्याधिकारी व पदाधिकारी यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने निविदा काढली गेली नाही. १ एप्रिलपासून शहरावर अंधाराचे सावट येणार, हे माहीत असूनही त्याची तजवीज करण्यात आली नाही. यापूर्वीच्या कंत्राटदाराला मुदतवाढही देण्यात आली नाही.
गेल्या १ व २ एप्रिलला संपूर्ण वणी शहर अंधारात होतो. त्यावेळी प्रशासनाची धावपळ सुरू झाली. त्यातही उपाययोजना करण्याचे सोडून मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी एकमेकांना जबाबदार धरून् ा एकमेकांवर चिखलफेक सुरू केली. दोन दिवसानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकरवी शहरातील पथदीवे सुरू व बंद करण्याची तात्पुरती व्यवस्था सुरू केली गेली. मात्र या कर्मचाऱ्यांना शहरातील सर्वच डी.पी. माहीत नसल्याने काही भागातील पथदीवे सुरू केलेच जात नव्हते. रात्री सुरू केलेले दीवे सकाळी उशिरापर्यंत बंदही केले जात नव्हते. त्यामुळे विजेचा अपव्यय होत होता.
यानंतर पथदिवे देखभालीची निविदा काढण्यात आली. मात्र एकच निविदा आल्याने प्रक्रिया तेथेच अडकून पडली. परिणामी देखभालीचे काम एका कंत्राटदाराकडे देण्यात आले. मात्र तेसुद्धा काहींच्या पोटात दुखू लागले. नंतर दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. त्यात तीन निविदा दाखल झाल्या. त्यामधील नागपूर येथील एका कंत्राटदाराची निविदा कमी दराची असल्यामुळे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. त्याला नुकताच कामाचा आदेश देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा शहरातील पथदिवे बंद असल्याने शहरात पुन्हा अंधार दाटला आहे. मात्र आता कोणताही पक्ष किंवा सामाजिक कार्यकर्ता याबाबत बोलायला तयार दिसत नाही. नगरपरिषदेच्या निगरगट्टपणामुळे सर्वांच्याच भावना बोथट झाल्या आहे.
आता नवीन कंत्राटदार तरी काम सुरू करतो, की नाही हे उद्या रविवारपासून कळणार आहे. नगरपरिषदेकडे स्वत:ची यंत्रणा नसल्याने जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ न देण्याचे कारण काय, असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. आता जुने मुख्याधिकारी बदलून नवे मुख्याधिकारी रूजू झाले. तरीही नगरपरिषदेचा गाडा रूळावर का येत नाही, हा चिंतनाचा विषय आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दुभाजकावरील पथदिव्यांचे कामही रखडले
शहरातील वरोरा रेल्वे गेट ते चिखलगाव गेट या रस्त्याच्या मधोमध पथदिवे लावण्याचे काम नागपूर येथील एका कंत्राटदाराला मिळाले. त्यांनी पथदिवे खांब व साहित्यही येथे आणून टाकले. पथदिवे खांब उभे करण्याचे बेस तयार करण्याचे कामही सुरू झाले. काही बेस तयारही करण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा काम बंद करण्यात आले. या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. मात्र त्याचे कामही अद्याप सुरू झाले नाही. पथदिवे कंत्राटदार रस्त्याच्या बांधकामाची वाट पाहत आहे, की इतर कोणाच्या कारणामुळे पथदिव्यांचे काम बंद आहे, हे कळायला कोणताच मार्ग नाही.