धावत्या बसची चाके निखळतात तेव्हा...
By Admin | Updated: May 16, 2016 02:36 IST2016-05-16T02:36:15+5:302016-05-16T02:36:15+5:30
‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो.

धावत्या बसची चाके निखळतात तेव्हा...
करळगाव घाटातील घटना : प्रवासी बचावले
यवतमाळ : ‘सुरक्षित प्रवासासाठी एसटी बरी’ असे महामंडळ म्हणते. पण, काही घटना पाहता एसटीचा प्रवास खरंच सुरक्षित आहे काय, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांच्या हृदयाचे ठोके चुकविणारी घटना रविवारी दुपारी १ वाजता करळगाव घाटात घडली. एसटी बसची मागील दोनही चाके निखळून गेली. चढावाचा भाग आणि चालकाचे प्रसंगावधान यामुळे प्रवासी तारले गेले.
यवतमाळ आगाराची ९३६६ या क्रमांकाची बस धामणगावहून यवतमाळकडे येत होती. बस यवतमाळजवळ पोहोचत असतानाच करळगाव घाटात या बसची चालकाच्या डाव्या बाजूकडील मागची दोनही चाके निखळून पडली. हा प्रकार होताच प्रवाशांना धक्का बसला. झाला प्रकार लक्षात येताच चालकाने बस जागीच थांबविण्यात यश मिळविले. हीच बस भरधाव असती तर मोठा अनर्थ घडला असता. या बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते असे सांगितले जाते.
यवतमाळ आगारात बसच्या देखभाल दुरुस्तीकडे कसे दुर्लक्ष सुरू आहे, याचा पुरावा या घटनेच्यानिमित्ताने मिळाला आहे. मेकॅनिकलचा निष्काळजीपणा आणि आगार प्रमुखांचे नसलेले नियंत्रण याबाबीमुळे अशा गंभीर घटना घडत आहे.
नटबोल्ट ढिले झाल्याने चाके निखळण्याची घटना घडली. यावरून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी किती गंभीर आहे, हे दिसून येते. (वार्ताहर)