पूरग्रस्तांचे पुनर्वसन कधी?

By Admin | Updated: August 8, 2015 02:43 IST2015-08-08T02:43:43+5:302015-08-08T02:43:43+5:30

तालुक्यातील पळशी गावकऱ्यांच्या ८ आॅगस्ट ही तारीख कायमची स्मरणात आहे.

When the flood victims were rehabilitated? | पूरग्रस्तांचे पुनर्वसन कधी?

पूरग्रस्तांचे पुनर्वसन कधी?

नागरिकांचा टाहो : शासन-प्रशासनाचे उदासीन धोरण
अविनाश खंदारे उमरखेड
तालुक्यातील पळशी गावकऱ्यांच्या ८ आॅगस्ट ही तारीख कायमची स्मरणात आहे. २००६ मधला हा दिवस कुणीही विसरू शकत नाही. महापुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली होती. आता या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झाले. मात्र पूरग्रस्तांच्या व्यथा कायमच आहे. पैनगंगेच्या रेडझोनमधील गावांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडले आहे. परिणामी पावसाळा आला की येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडते.
उमरखेड तालुक्याची जीवनदायी असलेली पैनगंगा नदी पावसाळ््यात आपल्याच लेकरांवर कोपते. वर्षानुवर्षे पैनगंगेच्या पुराचा फटका नदी तीरावरील गावांना बसत आहे. १९५८ पासून महापूर या गावातील नागरिकांनी बघितले आहे. मात्र २००६ सारखा महापूर कधीच बघितला नाही, असे या परिसरातील जानते वयोवृद्ध सांगतात. अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला पूर आला, त्यातच इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पैनगंगेचे पात्र फुगले. पाणी नदी तिरावरील गावांमध्ये शिरू लागले. पळशी गाव जलमय झाले होते. जीव वाचविण्यासाठी शेकडो नागरिक घराच्या छतावर चढून बसले होते. तत्कालिन सरपंच विलास सोळंके यांनी महसूल व पोलिस प्रशासनाला पळशी गावाची आपबीती मोबाईलवरून सांगितली. तत्कालिन पालकमंत्री मनोहरराव नाईक यांनी पळशी गावाकडे धाव घेतली. सैन्याच्या मदतीने तीन हजारावर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री रात्रभर पैनगंगेच्या तिरावर ठाण मांडून बसले होते. महापूर ओसरला आणि सुरू झाला आश्वासनांचा महापूर. मुख्यमंत्र्यांपासून आमदारापर्यंत सर्वांनी त्यावेळी पुनर्वसनाचे आश्वासन दिले, प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. परंतु अद्यापही पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम आहे.
पुनर्वसनासाठी पळशीच्या नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. निवेदने दिली, उपोषण करण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही, उमरखेड तहसीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पुनर्वसन मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे, मुंबई येथे एक बैठकही झाली होती. आवश्यक ती जागा उपलब्ध करून पळशी, देवसरी, चिंचोली संगम या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. परंतु मशी कुठे शिंकली हे कळलेच नाही. आता महापुराला नऊ वर्षे झाली, परंतु पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. आता पुनर्वसन काधी होते याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: When the flood victims were rehabilitated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.