भूमाफियांच्या अटकेचा मुहूर्त केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:16 AM2018-08-15T00:16:46+5:302018-08-15T00:17:05+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी गाजावाजा करुन स्थापन केलेली ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) भूमाफियांना मॅनेज झाली की काय, अशी शंका यवतमाळकर वर्तवित आहे. कारण राकेश, मंगेश, लतेश या प्रमुख आरोपींना तीन आठवडे लोटूनही अटक होऊ शकलेली नाही.

When the arrest of landlords? | भूमाफियांच्या अटकेचा मुहूर्त केव्हा ?

भूमाफियांच्या अटकेचा मुहूर्त केव्हा ?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एसआयटी’च्या तपासावर प्रश्नचिन्ह : पोलिसांचे अभय, आरोपी मोकाट अन् बिनधास्तसुद्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी गाजावाजा करुन स्थापन केलेली ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) भूमाफियांना मॅनेज झाली की काय, अशी शंका यवतमाळकर वर्तवित आहे. कारण राकेश, मंगेश, लतेश या प्रमुख आरोपींना तीन आठवडे लोटूनही अटक होऊ शकलेली नाही. मुळात त्यांच्या अटकेसाठी फारसे प्रयत्नच झालेले नाहीत. प्रामाणिकपणे तपास झाल्यास रेकॉर्डवर येण्याची शक्यता असलेले प्रतिष्ठीत मात्र अगदी बिनधास्तपणे होऊन चक्क पोलीस ठाण्यांसमोरुनच येरझारा मारताना दिसत आहे. त्यामुळेच ‘एसआयटी’च्या कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

भूखंड घोटाळ्यात एकापाठोपाठ सात गुन्हे नोंदविले गेले. परंतु त्यात दोन साक्षीदार, डॉक्टरसह चौघांचा अपवाद वगळता प्रमुखांना अटक झालेली नाही. यातील डॉक्टरचाही संबंध केवळ चेक बाऊन्सपुरता आहे. भूखंड घोटाळ्यात प्रत्यक्ष आरोपी असलेले प्रतिष्ठीत (?) गावात पोलिसांच्या नाकावर टिच्चून उजळमाथ्याने खुलेआम फिरताना दिसत आहेत. भूमाफियांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असले तरी त्याच्या तपासाबाबत ठाणेदारांना कितपत स्वातंत्र्य आहे, याचा आढावा खुद्द एसपींनी घ्यावा, असा सूर पोलीस दलातूनच ऐकायला मिळतो आहे. भूखंड घोटाळ्याच्या अतिशय संथगतीने सुरू असलेल्या तपासाबाबत खुद्द एसपी समाधानी कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर भूखंड प्रकरणात आरोपी नोंदविले गेले. मात्र त्यांच्या अटकेसाठी ‘एसआयटी’ची फारशी धडपड दिसून आली नाही. पोलिसांचे एक पथक मुंबईला पाठविण्यात आले, तेवढीच काय ती तपासातील प्रगती सांगता येईल. संबंधित शासकीय कार्यालये व बँकांशी पत्रव्यवहार करून केवळ कागदावर तपास केला जात आहे. घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याऐवजी ‘भिऊ नका, आम्ही पाठीशी आहेत’, अशा स्वरूपाचे संदेश बँकांना व आरोपींना मौखिकरीत्या पाठविले जात आहे. त्यामुळे सर्वच अगदी बिनधास्त झाले आहे. त्यातूनच हिंमत वाढल्याने राजकीय नेत्यांच्या अवतीभोवती वावरणारी मंडळी ‘आम्हाला हातकड्या घालण्याची कुणाची ताकद आहे?’ अशा वल्गना करताना दिसत आहे. त्यामुळेच यवतमाळकर जनता व फसविले गेलेले नागरिक ‘एसआयटी’च्या कार्यतत्परतेकडे संशयाने पाहत आहेत. बनावट मालकाने प्रॉपर्टी विकलेली मूळ भूखंडधारक मंडळी मात्र त्रस्त आहे. आपली प्रॉपर्टी केव्हा मुक्त होणार याची त्यांना प्रतीक्षा आहे.
फिर्यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला
आपला भूखंड परस्परच दुसºयाने नावावर केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली. मात्र यातील फसविले गेलेले केवळ पोलिसात फिर्याद देऊन मोकळे झाले. त्यांच्याकडून आरोपींच्या अटकेबाबत कोणताच पाठपुरावा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. आरोपींच्या अटकेसाठी त्यांचाच तगादा नसल्याने पोलीसही फारसे टेंशन घेताना दिसत नाही. यातील काही फिर्यादींनी मात्र सोमवारी जिल्हाधिकाºयांची प्रत्यक्ष भेट घेतली.
कोट्यवधी लुटूनही बँका अधिकाऱ्यांच्या पाठीशी
भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव, मंगेश पन्हाळकर अद्याप अटक झालेले नाही. मंगेश मुंबईत तर राकेश उत्तरप्रदेशात आश्रयाला असल्याचे बोलले जाते. ते अटक झाल्यास व त्यांची प्रामाणिकपणे बयाने नोंदविली गेल्यास अनिल, राहुल, रवी, हिंदुत्ववादी पहेलवान, लतेश आदी मंडळी आणि वेळप्रसंगी त्यांचे राजकीय व भाईगिरीतील पाठीराखेसुद्धा रेकॉर्डवर येऊ शकतात. परंतु सध्या जणू अटकेतून अभय मिळाल्याने ही सर्व मंडळी बिनधास्त आहेत. राकेश व मंगेश पोलिसांच्या हाती लागू नये, कायम फरारच रहावे यासाठी या पाठीराख्यांची धडपड सुरु आहे. इकडे बँकांचे कर्तेधर्ते व अधिकारी मंडळीही ‘टेन्शन फ्री’ दिसून येते. जनतेचा पैसा भूमाफियांनी लुटून नेऊनही साधी पोलिसात स्वत:हून फिर्याद देण्याची तसदी या बँकांच्या संचालकांनी घेतलेली नाही. उलट २५ ते ३० लाखांची मार्जीन ठेऊन कर्ज मंजूर करणाºया यंत्रणेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न बँकांकडून सुरू आहे.
वाघापुरातील भूखंडात डॉक्टरची फसवणूक
बोगस खरेदीत साक्षीदार म्हणून रेकॉर्डवर आलेल्या नीलेशकडून यवतमाळातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरने वाघापूर परिसरात पत्नीच्या नावाने भूखंड खरेदी केला. यात बोगस मालक उभा झाल्याने डॉक्टरची फसवणूक झाली आहे. यापूर्वी ज्या दलालाच्या माध्यमातून अनेक प्रॉपर्टी खरेदी केल्या, त्यानेच ही फसवणूक केली. आपले नाव रेकॉर्डवर येण्याची भीती या डॉक्टरला आहे. मात्र अभय मिळाल्याने हा डॉक्टर आता अगदी बिनधास्त झाला आहे.

Web Title: When the arrest of landlords?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा