धावत्या एसटीच्या चाकांचे बोल्ट निघतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:04+5:30
मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही बाब उशिरा लक्षात आली असती तर चाक निखळून बस उलटून अपघात झाला असता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामीण भागातील रस्त्यावरून एसटी बस धावत होती... मागाहून आलेल्या वाहनाने एसटी बस गाठत चालकाला सांगितले... अहो, तुमच्या बसचे चाक निखळून पडत आहे... त्याचवेळी प्रवाशांच्या कानावर ही वार्ता पडली... बस थांबताच त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही बाब उशिरा लक्षात आली असती तर चाक निखळून बस उलटून अपघात झाला असता. आगारातील यांत्रिक विभागातून झालेली हयगय प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. या बसमध्ये ७० प्रवासी होते.
यापूर्वीही बसची चाके निखळून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतरही काही कामगारांकडून बसच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष केले जात आहे. अर्ध्यातच प्रवास रखडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विभागाशी आणि आगाराशी संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
बसफेऱ्यांचा अर्धवट प्रवास, प्रवाशांना होतोय नाहक त्रास
यवतमाळ आगारातून सोडल्या जाणाऱ्या काही बसेसच्या फेऱ्या अर्धवट होत असल्याची माहिती आहे. बसफेरीसाठी आवश्यक ती पूर्ण तयारी झालेली असताना काही चालक, वाहकांकडून जाणीवपूर्वक फेरीला विलंब केला जातो. यात वेळ गेल्यामुळे लागूनच असलेली दुसरी फेरी टाळण्यासाठी हा उपद्व्याप केला जात आहे. प्रामुख्याने यवतमाळ-धामणगाव बसफेऱ्यांबाबत हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. २६ सप्टेंबर रोजी शेड्यूल नं.१२, ५४, ५५, २२, १४०, १४१ बाभूळगाववरूनच परत आले. धामणगाव किंवा पुलगाव फेऱ्या पूर्ण केल्या नाही. या प्रकारात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. शिवाय बाभूळगावपुढील प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.