लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोमवारपासून शहरातील आठवी तर ग्रामीण भागात पाचवीपासूनचे वर्ग भरणार आहे. मात्र जिल्ह्यातील एकूण ३४ हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी शाळेत कसे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ९९ टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. मात्र अनुदानित शाळांमधील विशेषत: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अपूर्ण आहे. परंतु त्याचा वर्ग अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता नाही.
५५० शाळा झाल्या सुरू
जिल्ह्यात ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या ५०२ शाळा १५ जुलैपासून सुरू झाल्या. नंतर या संख्येत वाढ झाली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये एकही विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह निघालेला नाही.
लस न घेता शिक्षक शाळेत जाणार काय?
जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण आटोपले आहे. काही मोजक्या शिक्षकांचे लसीकरण शिल्लक आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ज्या मोजक्या शिक्षकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्या बाबतीत मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र अशा शिक्षकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरून काम भागविता येणार आहे. अनेक शिक्षकांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. आता दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना १ ते ३ महिने वाट पाहावी लागणार आहे.