भारनियमनाचा मूर्तीकारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:50 IST2017-09-18T21:50:34+5:302017-09-18T21:50:48+5:30
देशातील दुसºया क्रमांकाच्या दुर्गोत्सवाला तीन दिवसानंतर यवतमाळात प्रारंभ होत असून मूर्तीकारांना मात्र भारनियमनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

भारनियमनाचा मूर्तीकारांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशातील दुसºया क्रमांकाच्या दुर्गोत्सवाला तीन दिवसानंतर यवतमाळात प्रारंभ होत असून मूर्तीकारांना मात्र भारनियमनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ढगाळी वातावरणामुळे मूर्ती सुकविण्यासाठी वेळ लागत आहे. त्यातच भारनियमनामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मूर्तीकारांना अनेक आॅर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे.
यवतमाळ शहर दुर्गोत्सवासाठी सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यवतमाळ शहरातील कलावंत मातेची मूर्ती घडविण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. साक्षात देवी अवतरल्याचा भास व्हावा एवढ्या हुबेहुब मूर्ती यवतमाळातील कलावंत साकारतात. परंतु यावर्षी भारनियमनाचा फटका मूर्तीकारांना बसत आहे. किमान चार ते पाच तासाचे भारनियमन असल्याने मूर्ती सुकविण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हीटरच्या सहाय्याने मूर्ती सुकविण्याचे काम करीत आहे. तसेच मोठ्या मूर्तींना रंग काम करण्यासाठी क्रॉम्प्रेसरचा उपयोग केला जातो. परंंतु ही मशीनही भारनियमनामुळे चालविणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत अनेक मूर्तीकारांनी मूर्तीच्या आॅर्डर रद्द केल्या आहे.
रोषणाई प्रभावित
दुर्गोत्सवाच्या काळात संपूर्ण शहरावर रोषणाई केली जाते. मात्र यंदा भारनियमनाचा फटका रोषणाईलाही बसणार आहे. लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या रोषणाईचा आनंद यवतमाळकरांना घेताना अडचण जाणार आहे. या काळात भारनियमन नको अशी भाविकांची मागणी आहे.