सरपंचानेच केला पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: May 15, 2014 02:25 IST2014-05-15T02:25:35+5:302014-05-15T02:25:35+5:30
दिग्रस तालुक्यातील साखरा येथील सरपंचाने हेतुपुरस्सर गावातील काही भागातील पाणीपुरवठा बंद करून गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याचा आरोप ..

सरपंचानेच केला पाणीपुरवठा बंद
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील साखरा येथील सरपंचाने हेतुपुरस्सर गावातील काही भागातील पाणीपुरवठा बंद करून गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याचा आरोप गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
साखरा येथील विशाल चव्हाण आणि इतर गावकर्यांना जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, गावातील सरपंचांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान गावातील काही नागरिकांनी माझ्या मर्जीविरुद्ध इतर पक्षाला मतदान केल्याची बाब समोर केली. याच कारणातून गावातील काही भागात ग्रामपंचायतमार्फत होणारा पाणीपुरवठा बंद केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि गावात पाण्याचे इतर स्त्रोत नसल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे.
साखरा गावची लोकसंख्या दोन हजार ७00 असून गावामध्ये दोन विहिरी आहे. त्यातील पाणीसुद्धा अत्यल्प प्रमाणात आहे. गावात असलेले तीन हातपंप बंदस्थितीत आहे. ग्रामपंचायतीमार्फत नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होत होता. त्यातून गावकर्यांना कसेतरी पिण्याचे पाणी मिळत होते. परंतु सरपंचांनी आता हा पाणीपुरवठा बंद केला आहे. नागरिकांनी सरपंचांना या बाबत विचारले असता त्यांनी पाईप फुटले आहेत, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे दिली.
सरपंच स्वत:च्या टँकरने पाणी आणून जवळच्या लोकांना त्याचे वितरण करत आहे. गावातील ठराविक नागरिकांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवत आहे. या गंभीर प्रकरणाची शासनाने त्वरित दखल घेवून दोषींवर कडक कारवाई करावी व नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी साखरा येथील विशाल चव्हाण, रोहदास चव्हाण, पवन आडे, दुर्गादास चव्हाण, आशिष चव्हाण, अनिल राठोडव इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)