पाणीटंचाई कृती आराखडा २१ लाखांचा
By Admin | Updated: May 15, 2014 23:58 IST2014-05-15T23:58:54+5:302014-05-15T23:58:54+5:30
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कळंब तालुक्यासाठी २१ लाख रु पयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

पाणीटंचाई कृती आराखडा २१ लाखांचा
कळंब : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कळंब तालुक्यासाठी २१ लाख रु पयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. कृती आराखड्याची किंमत लक्षात घेता यावर्षी प्रशासनाच्या लेखी पाणीटंचाईची तीव्रता कमी असल्याचे दिसून येते. यामध्ये तालुक्यातील १३ गावात नवीन विंधन विहीर घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यासाठी ७ लाख ८0 हजार रूपये खर्च अपेक्षित होता. परंतु केवळ देवनळा आणि मंगरूळ या गावांमध्येच नवीन विंधन विहीर घेण्याला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी १ लाख २0 हजार रूपये खर्च केले जाणार आहे. तसेच ९ गावात नळयोजनेची विशेष दुरूस्ती केली जाणार आहे. यासाठी ९ लाख रूपये खर्च केले जाणार आहे. यामध्ये किन्हाळा, नांझा, निलज, नरसापूर, पोटगव्हाण, पिंपळगाव, बर्हाणपूर, धोत्रा व डोंगरखर्डा या गावांचा समावेश आहे. विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करण्यासाठी २६ गावे प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु यापैकी एकाही कामाला मंजुरात देण्यात आली नाही. तालुक्यातील १४ गावातील १५ खासगी विहीर अधिग्रहन करण्याचा प्रस्ताव होता. परंतु वटबोरी, जोडमोहा, बेलोरी, गांढा, मोहदरी या गावातील विहिरींचेच अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी १ लाख ३५ हजार रूपये खर्च केले जाणार आहे. ६ गावातील विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्यात येणार आहे. यामध्ये मलकापूर, कोठा, कळंब, पिंपळखुटी, मेंढला व पार्डी (सावळापूर) या गावांचा समावेश आहे. यासाठी १ लाख ८0 हजार रूपये खर्च केले जाणार आहे. तालुक्यातील १0 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये खटेश्वर किनवट, कैलासपूरी, कोठा, कळंब, प्रधानबोरी, मार्कंंडा, पंगडी, पिढा व गणेशवाडी या गावांचा समावेश आहे. यासाठी ७ लाख ५0 हजार रूपये खर्च होणार आहे. तालुक्यातील गावांमध्ये ४९५ हातपंप असून यापैकी १४ कायम बंद झालेले आहे. पैकी ३ हातपंप नादुरूस्त आहे. ४१४ सार्वजनिक विहिरी असून त्यापैकी १९ विहीरी नादुरूस्त आहे. ५३ पाणी पुरवठय़ाच्या नळयोजना असून सर्वच नळयोजना सुस्थितीत सुरू असल्याचे पंचायत समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असले तरी मागील वर्षी समाधानकार पाऊस पडल्याने यावर्षी तेवढी पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी कमी राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)