पैनगंगा नदी काठालगतच्या ५० गावांचा पाणी प्रश्न तीव्र
By Admin | Updated: June 4, 2015 02:14 IST2015-06-04T02:14:45+5:302015-06-04T02:14:45+5:30
इसापूर धरणातील पिण्याच्या पाण्यासाठीचा कोटा आरक्षित असतानाही सिंचन विभाग वेगवेगळे निकष लावत आहेत.

पैनगंगा नदी काठालगतच्या ५० गावांचा पाणी प्रश्न तीव्र
उमरखेड : इसापूर धरणातील पिण्याच्या पाण्यासाठीचा कोटा आरक्षित असतानाही सिंचन विभाग वेगवेगळे निकष लावत आहेत. नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही नदी काठालगतच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. पाणी समस्या गंभीर झाली असल्याने या भागातील तहानलेल्या लोकांचा संयम सुटला आहे. पाणी समस्या सोडविण्यासोबतच या भागातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्यासाठी माजी आमदार तथा वसंत साखर कारखाना अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात सध्या दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असताना याकडे प्रशासनाचे बिलकुल लक्ष नाही. पावसाळ््याच्या दिवसांमध्ये नदीला मोठा पूर येतो, या पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतजमिनीचे दरवर्षी प्रचंड नुकसान होते. ही बाब सर्वश्रृत असताना उन्हाळ््यात मात्र नदीकाठच्या ५० हून अधिक गावांना पाण्यासाठी भटकावे लागते. दरवर्षी हा प्रकार सुरू असताना यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नच होत नसल्याचे दिसून येते. नागरिकांचे प्रश्न वेळेत निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी इतर कामांना बगल देऊन या कामांना प्राधान्य द्यावे, जनतेला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये असा देखील इशारा नागरिकांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेऊन कामे केल्यास विकासकामे अधिक गतिमान होऊ शकतात.
केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नव्हे तर जनतेच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची शिवसेनेची तयारी आहे. त्यासाठी समन्वयाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अॅड़ बळीराम मुटकुळे, जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पांढरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबूराव कदम, हिमायतनगरचे किसनराव वानखडे, भगवंत चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत चव्हाण, संचालक बळवंत नाईक, प्रवीण सूर्यवंशी, उत्तम देवकते, सुदर्शन रावते, प्रवीण मिरासे, रमेश गायकवाड, धनंजय माने, विनायक कदम, रंजीत नलावडे, बबन कदम, प्रशांत पत्तेवार, कैलास वानखेडे, अविनाश कदम यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)