गजानन अक्कलवारलोकमत न्यूज नेटवर्ककळंब : वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. तालुक्यातील इतर तलावांमध्येही पाण्याचा मोठा साठा आहे. जून अखेरपर्यंत प्रकल्पात पाणी राहणार असल्याने शहरासह तालुक्यातील गावांना पाणी टंचाईवर मात करणे सोपे जाणार आहे. कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज होतात. त्यामुळे नव्याने कळंब शहरासाठी नळयोजना करण्याची मागणी केली जात आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. परंतु आता एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. इंधन विहिरीची दुरुस्ती करणे, विहिरीचे खोलीकरण करणे, सार्वजनिक विहिरीची नव्याने निर्मिती करणे आदी उपाययोजना पंचायत समिती स्तरावरून गावपातळीवर करण्यात आल्या आहे.
टंचाई नसली तरी कृती आराखडा तयार तालुक्यातील एकाही गावात आतापर्यंत तरी टँकरने पाणीपुरवठा करावा लागलेला नाही. जलस्रोतांच्या पाण्याची पातळी कमी होत असले, तरी सद्यस्थितीत पाणीटंचाईची झळ बसलेली नाही. असे असे तरी प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कळंबला चार ठिकाणावरून पाणीपुरवठा
- कळंब शहरातला वर्धा नदी, गायसागर, चक्रवती नदीवरील विहीर, महावीर नगरमधील नळयोजनेची विहीर या चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. त्यामुळे मुख्य नळयोजनेला पाण्याची कमतरता पडणार नाही.
- तीन महत्त्वपूर्ण जलस्रोतांना ‘चार्ज’ करण्यासाठी दत्तापूर व घोटी तलावाचे पाणी सोडले जाणार आहे. वर्धा नदीच्या पात्रामध्ये खोदण्यात आलेल्या विहिरीतून कळंब शहराला पाणीपुरवठा केला जातो.
- वाढलेली लोकसंख्या व जीर्ण झालेली नळयोजनेला लक्षात घेता बेंबळा धरणावरून नवीन नळयोजना सुरू करण्याची कळंबवासीयांची मागणी आहे. यावर्षी पाणीप्रश्न निर्माण झाला नसला तरी भविष्यातील उपाययोजना म्हणून हा प्रयोग अपेक्षित आहे.
नियमित पाणीपुरवठ्याचा प्रयत्न
शहरासाठी चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकदा विजेअभावी पाणीपुरवठा खंडित होतो. सध्या तीन-चार दिवसाआड पाणी सोडले जात आहे. चक्रवती नदीला प्रकल्पाचे पाणी सोडून नदीकाठावरील सर्व जलस्रोतांच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. - नंदू परळकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कळंब
कळंब तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याचे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध आहे. काही गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.- सुभाष मानकर, गटविकास अधिकारी, कळंब