जलवाहिनीची आयुष्य मर्यादा संपली
By Admin | Updated: August 24, 2014 23:46 IST2014-08-24T23:46:23+5:302014-08-24T23:46:23+5:30
शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ

जलवाहिनीची आयुष्य मर्यादा संपली
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ बदलविण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळला गेला आहे. यातून शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात १९७२ मध्ये जलवाहिनीचे जाळे विणण्यात आले. त्यावेळी पीव्हीसी आणि सिमेंट पाईपचा वापर करण्यात आला. या जलवाहिनीची आयुष्य मर्यादा ३० वर्षे असून ती २००२ मध्येच संपली. यानंतर तब्बल १२ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र जीर्ण पाईप लाईन बदलविली नाही. नवीन पाईप लाईनसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यासाठीचा प्रस्ताव प्राधिकरणाने राज्य शासनाकडे पाठविला. मात्र या प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. तब्बल १२ वर्षानंतरही हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने जलवाहिनीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. काही भागात नालीच्या खालच्या भागात पाईप लाईन आहे. नाली फुटल्याने तेथे पाईप लाईन लिक झाल्याची गंभीर बाब शहरात उघड झाली आहे. यातून जलजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे.
लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात २९ हजार ३१३ नळजोडण्या आहेत. या माध्यमातून दोन लाख ७५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. ३५० किलोमीटर जलवाहिनीचा विस्तार आहे. यासाठी बिड आणि लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आला आहे. बिडच्या पाईपची आयुष्यमर्यादा ६० वर्षांची तर लोखंडी पाईपची आयुष्य मर्यादा १०० वर्षांची आहे. पाईप लाईनचा विस्तार करताना लोखंडी पाईप आणि बिडच्या पाईपचा वापर करण्यात आला आहे. अशीच जलवाहिनी इतर भागात अपेक्षित आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.
एका पाण्याच्या टाकीवरून दोन किमी अंतरापर्यंत चांगल्या पध्दतीने पाणीपुरवठा करता येतो. पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. मात्र सध्याच्या स्थितीत जुनी पाईप लाईन आहे. त्याचा आकारही लहान आहे. यावरच नवीन नळजोडण्या लावण्यात आल्या आहे. त्यातच एका टाकीवरून १२ किमी अंतरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही भागात पुरेसे पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या टाक्या उभारण्याची आवश्यकता आहे. तीन नवीन टाक्यांचा प्रस्ताव प्राधिकरणाने दिला आहे. त्यावर अजूनही विचार झालेला नाही. शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी दर दिवसाला ३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवशकता आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे २७ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.
जलवाहिनीचा दाबाचे एक सूत्र निश्चित करण्यात आले आहे. एका मिनिटाला १२ लिटर पाणी जमा होणे अपेक्षित आहे. मात्र मर्यादित जलवाहिनीवर अतिरिक्त भार असल्याने हे सूत्र जुळतच नाही. परिणामी नागरिकांना पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नसल्याचे सांगितले जाते.