पाण्याला आले सोन्याचे मोल, टाकीला लागले कुलूप
By Admin | Updated: April 25, 2016 02:07 IST2016-04-25T02:07:43+5:302016-04-25T02:07:43+5:30
लोटाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याने पाण्याला आता सोन्याचे मोल आले आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून ....

पाण्याला आले सोन्याचे मोल, टाकीला लागले कुलूप
टाकीवर लिहिले जाते नाव : पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा
रूपेश उत्तरवार यवतमाळ
लोटाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याने पाण्याला आता सोन्याचे मोल आले आहे. पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एवढेच नाही तर पाण्यासह टाकी चोरीस जाऊ नये म्हणून त्यावर नावही लिहिले जात आहे. गत १५ दिवसांपासून पाणी टंचाईचाही दाहकता अनुभवणाऱ्या लोहाऱ्यात पाणी कडीकुलूपात बंद झाले. शहरालगत अशी अवस्था असले तर ग्रामीण भागात काय चित्र असेल याची कल्पनाही करवत नाही.
यवतमाळ नगरपरिषदेत समाविष्ठ झालेल्या बहुतांश भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लोहारा परिसरातही भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिक करीत आहे. या भागातील विहिरी कोरड्या झाल्या आहे. हातपंपाला तासभर हापसल्यानंतर गुंडभर पाणी मिळणेही अवघड झाले आहे. अपुऱ्या नळ योजनेने केव्हाच अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या भागातील तहान पाण्याच्या टँकरवरच अवलंबून आहे. टँकर केव्हा येईल, याची खात्री नसते. त्यामुळे नागरिक पाण्याची साठवणूक करीत आहे. पाणी साठविण्यासाठी नागरिकांनी घरासमोर प्लास्टिकचे ड्रम ठेवले आहे. टँकरमधून आलेले पाणी या ड्रममध्ये साठविले जाते. मात्र रात्रीच्या वेळी या ड्रममधील पाणी चोरीस जात असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी यावर नामीयुक्ती योजली. प्लास्टिकच्या ड्रमला कडीकुलूप लावून घेतले. घरासमोर टँकर आला की कुलूप उघडायचे. ड्रममध्ये पाणी भरायचे आणि पुन्हा कुलूप लावायचे असा प्रकार सुरू आहे. सोन्यापेक्षाही पाण्याला अधिक महत्व आल्याचे यावरून दिसून येते. तसेच काही भागात पाण्याचे ड्रम चोरीस जाण्याची भीती असल्याने या ड्रमवर चक्क नाव लिहिले आहे. लोहारा परिसरात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून येणारा प्रत्येक टँकर अवघ्या काही मिनिटातच रिकामा होतो. कितीही टँकर आले तरी येथे अपुरेच पडत आहे. एकंदरित पाणी म्हणजे जीवन असते याचा अनुभव आता या भागातील नागरिकांना येत आहे. लोहारा सारखीच अवस्था जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही असून पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.