बियाणे कृत्रिम टंचाईवर १७ भरारी पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:38+5:30

यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे.

Watch 17 flying squads on artificial scarcity of seeds | बियाणे कृत्रिम टंचाईवर १७ भरारी पथकांचा वॉच

बियाणे कृत्रिम टंचाईवर १७ भरारी पथकांचा वॉच

ठळक मुद्देकलेक्टरची बैठक : बोगस बियाणे, जादा दराने विक्रीवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सोयाबीनसह अन्य बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने होणारी विक्री रोखणे, बोगस बियाणे थांबविणे आदी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाची १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सोमवारी येथे बैठकीत दिले.
यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे. प्रमुख वितरकांची गोदामे बियाण्यांनी भरली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या सर्व मुद्यांवर ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाशझोत टाकून वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यां यवतमाळातील व ग्रामीणमधील प्रमुख वितरकांचा पर्दाफाश केला. ही वृत्तमालिका कृषी आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने पुण्यातूनही येथील कृषी अधिकाºयांची झाडाझडती घेतली गेली.
या वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सर्व सोळाही तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. त्यात खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध मुद्यावर चर्चा केली गेली. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर वॉच ठेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. एमआरपी पेक्षा जादा दराने विकणाऱ्यांनाही दणका देण्याची सूचना केली गेली. सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बियाणे व खतांच्या मागणी व पुरवठ्यात तफावत येणार नाही या दृष्टीने निरीक्षण व नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले गेले. वणीपासून उमरखेडपर्यंत बियाणे व खतातील गोंधळ थांबविण्यासाठी १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली.

फवारणी विषबाधेबाबतही सावधगिरी
तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन अनेक शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कीटकनाशक फवारणीच्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देश देण्यात आले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कुण्या शेतकºयाला विषबाधा झाल्यास लगेच तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाºयांना याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या गेल्या. या बैठकीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. कृषी अधिकाºयांनी बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईचे मूळ शोधण्याची व कंपन्यांसह विविध ठिकाणावरून माहिती मागविण्याची व्युहरचनाही केल्याचे सांगितले जाते.

Web Title: Watch 17 flying squads on artificial scarcity of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती