आता बोलतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंती
By Admin | Updated: February 4, 2016 02:33 IST2016-02-04T02:33:43+5:302016-02-04T02:33:43+5:30
जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

आता बोलतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंती
चित्रकारांसाठी खुली स्पर्धा : चेतना अभियानात चित्ररुपाने जनजागृती, शेतकऱ्यांना प्रेरणादायी चित्रांचा समावेश
यवतमाळ : जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असे चित्र, पेंटीग्स काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरातील चित्रकार, शाळा, महाविदयालयीतील विदयाथ्यांनी स्वयंत्स्फूर्तीने अशी चित्र रेखाटावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासनाचे मुख्य कार्यालय असल्याने येथे नागरिकांची सतत वर्दळ असते. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहेच, परंतु हेच जर परिणामकारक अशा चित्रांमधून दाखविल्यास शेतकऱ्यांना त्यापासून निश्चितच प्रेरणा मिळेल. हा यामागील उददेश आहे. यामध्ये प्रगतशील शेतकरी, शेत नांगरणारा शेतकरी, टॅ्रक्टर चालविणारा शेतकरी, सिंचनाखालील शेत, कृषी पंपाने ओलीत करणारा शेतकरी, वडील शेतात काम तर त्यांचा मुलगा अधिकारी पदावर काम करीत असतांना असे आपल्याच कल्पनेतील नानाविध विषय चित्रकारांना रेखाटायची आहे.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दर्शनी भागातील भिंती चित्रकारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी चित्रकार, शालेय व महाविदयालयीन विदयार्थी यांनी आपल्या नावाची नोंद बळीराजा चेतना कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे करावी.
यासाठी प्रथम पारीतोषीक दहा हजार रुपये, द्वितीय पाच हजार तर तृतीय क्रमांकाला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाभरातील जास्तीत जास्त चित्रकार व विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)