दिग्रस : तालुक्यात २०१२-१३ या वर्षामध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर सतत तीन वर्षे कोरडा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आहे. म्हणूनच मागील दोन वर्षातील थकीत पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. शासनाने २०१४-१५ व २०१५-१६ मधील थकीत शेतकऱ्यांना पीककर्जाचे पुनर्गठन करून पुन्हा कर्ज दिले. मात्र अतिवृष्टी व नापिकीत सापडलेल्या २०१२-१३ ते २०१४ या वर्षामधील पीडित शेतकरी पीककर्जाचा भरणा करू शकलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर शासनाने एक प्रकारे अन्यायच केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील २५ सहकारी सोसायटीमधील २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षामधील थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा घेतल्यास साधारण दीड हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांची संख्या आहे. तालुक्यातील आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असताना व तीन-चार वर्षांपासून नापिकी असताना यंदा पेरणी कशी करावी, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तीन-चार वर्षापासून बँकेचे पीककर्ज थकल्यामुळे नवीन कर्जासाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहे. खासगी सावकारांनी कर्ज देणे बंद केले आहे. नापिकीच्या काळात कर्ज न मिळाल्यास २०१२-१३ मधील थकीत शेतकऱ्यांना शेती विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. (शहर प्रतिनिधी)
दोन वर्षातील कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा
By admin | Updated: May 8, 2016 02:09 IST