जिल्ह्याला मान्सूनची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 10, 2015 02:28 IST2015-06-10T02:28:47+5:302015-06-10T02:28:47+5:30
केरळमध्ये मान्सून धडकला असला तरी जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी त्याला थोडा अवधी लागणार आहे.

जिल्ह्याला मान्सूनची प्रतीक्षा
३४३ हेक्टरवर मान्सूनपूर्व पेरणी : ६५ मिमी पावसानंतरच पेरणी करा
यवतमाळ : केरळमध्ये मान्सून धडकला असला तरी जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी त्याला थोडा अवधी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. ६५ मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. तर दुसरीकडे ओलीताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी ३४३ हेक्टरवर मान्सूनपूर्व पेरणी केली आहे.
कृषी विभागाने साडेआठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्याचे नियोजन तयार केले आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा कपाशीचा आहे. कापसाच्या लागवडीसाठी ७ जुलैपर्यंतचा कालावधी महत्वाचा आहे. त्याच सोबत टोबनीसाठी लागणारा पाऊस महत्वाचा आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या सध्या थांबल्या आहेत.
या खालोखाल सोयाबीनची लागवड होणार आहे. सोयाबीनच्या लागवडीसाठी आवश्यक असलेली उगवनशक्ती तपासणे आवशक आहे. त्यासोबतच मोझाइकला बियाणे बळी पडलेले नसावे. असेच बियाणे पेरण्यासाठी योग्य आहे. त्यादृष्टीने योग्य बियाण्याची निवड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.
जून-जुलै महिन्यातील पेरण्या महत्वाच्या आहे. असे असले तरी ६५ मिमी पाऊस उगवण शक्तीसाठी योग्य आहे. हा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद यादगीरवार यांनी केले आहे. अन्यथा पुरेशा पावसाअभावी पेरणी वाया जाण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन केले आहे. (शहर वार्ताहर)