महागाव (कबसा) : महागाव कसबा परिसरात तीनवेळा गारपिट झाली असून या नैसगिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. अवकाळी पावसासह गारपिट व वादळाने हाती आलेले रबीचे पिकही नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला असून हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी सध्या शासकीय अनुदानाची वाट पाहत आहे. शासनाने ओलित असणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सर्व्हे करण्यात आला. ओलित शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसली तर मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे शासकीय संबंधित यंत्रणेला कोरडवाहू शेतीचा सर्व्हे करण्याचे आदेशसुद्धा शासनाने दिलेले नाही. ज्याप्रमाणे या नैसगिक प्रकोपामुळे ओलित करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी प्रथम पावसाची दडी आणि नंतर अवकाळी पावसाने चांगलाच झटका दिला. त्यामुळे आता केवळ शेतकऱ्यांच्या आशा रबीवर होत्या. परंतु या नैसगिक आपत्तीमुळे रबी हंगामातील पिक घरी येण्याच्या मार्गावर असताना ऐन निसर्गाने आपला डाव खेळला. त्यामुळे ओलित व कोरडवाहू अशा दोन्ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीनुसार भरपाई त्वरित देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने भेदभाव न करता ओलित व कोरडवाहू या दोन्ही प्रकारातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. गारपिटीचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट त्वरित भरपाई मिळावी आणि ती त्यांच्या खात्यात जमा व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. वेळेवर मदत दिल्यास ती उपयोगी पडू शकेल, त्यामुळे शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
कोरडवाहू शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: January 10, 2015 02:07 IST