५२६ शेतकर्यांना माती परीक्षण अहवालाची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 22, 2014 01:37 IST2014-05-22T01:37:17+5:302014-05-22T01:37:17+5:30
शेतकर्यांना भरघोस उत्पादन घेता यावे म्हणून माती परीक्षणाची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येते.

५२६ शेतकर्यांना माती परीक्षण अहवालाची प्रतीक्षा
बाभूळगाव : शेतकर्यांना भरघोस उत्पादन घेता यावे म्हणून माती परीक्षणाची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. माती नमुन्याचा अहवाल आल्यानंतरच पिकांचे नियोजन केले तर भरघोस उत्पादन होऊ शकते. बाभूळगाव कृषी अधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील ५२६ शेतकर्यांच्या शेतातील माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. मात्र पावसाळा तोंडावर येवूनही माती परीक्षणाचे अहवाल अजूनही प्राप्त न झाल्यामुळे शेतकर्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी सतत आर्थिक विवंचनेत जगत आहे. लागलेला खर्च व शेतातून निघालेले उत्पादन याचा मेळ बसताना दिसत नाही. त्यामुळेच शेतकर्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे, ही बाब प्रकर्षाने समोर आली. शासनाकडून या संदर्भात जनजागृतीही करण्यात आली. परिणामी आपल्या शेत जमिनीत कोणती द्रव्ये किती प्रमाणात याची माहिती प्राप्त होते. त्यामुळेच तालुक्यातील शेतकर्यांनी बाभूळगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माती नमुने आणून दिले. यासाठी लागणारे निर्धारित शुल्कसुद्धा शेतकर्यांनी भरले आहेत. मात्र अजूनपर्यंंत या माती नमुन्याचे अहवालच प्राप्त झाले नाही. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या यवतमाळ येथे मृद परीक्षण केंद्र असताना त्यांनी बाभूळगाव तालुक्यातून गोळा केलेली माती अमरावती जिल्ह्यातील घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्रात पाठविण्याचे आदेश येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दिले. या कार्यालयाने २0१३-१४ साली गोळा करण्यात आलेले ५२६ शेतकर्यांच्या शेतातील मातीचे नमुने अमरावती जिल्ह्यातील घातखेड येथे पाठविले. २८ फेब्रुवारीला पाठविलेल्या नमुन्याचे अहवाल अद्यापपर्यंंत प्राप्त न झाल्यामुळे शेतकरी मात्र धास्तावला आहे. या प्रकारामुळे शेतकर्यांना आपल्या शेतातील मातीतील घटकांचे प्रमाण समजण्यास उशिर होत आहे. सदर माती नमुने वेळेवर आले असते तर शेतकर्यांना त्या प्रमाणे नियोजन करता आले असते. पावसाळा तीन आठवड्यावर येवून ठेपला असताना माती परीक्षणाचे अहवाल मात्र येण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (प्रतिनिधी)