कळंब ग्रामीण रुग्णालयाला भेट
By Admin | Updated: August 4, 2015 02:40 IST2015-08-04T02:40:14+5:302015-08-04T02:40:14+5:30
उंदराने कुरतडलेले आलू, चिमलेले केवळ पाच वांगे, तीन टमाटे, पिण्याचे अशुध्द पाणी शिवाय स्वयंपाकगृहाची दयनीयता,

कळंब ग्रामीण रुग्णालयाला भेट
कळंब : उंदराने कुरतडलेले आलू, चिमलेले केवळ पाच वांगे, तीन टमाटे, पिण्याचे अशुध्द पाणी शिवाय स्वयंपाकगृहाची दयनीयता, ही गंभीर परिस्थिती सोमवारी आमदार डॉ. अशोक उईके यांनी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रत्यक्ष अनुभवली. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या समस्याही मांडल्या. यावर संताप व्यक्त करत आमदारांनी कर्मचाऱ्यांना खडसावले.
या वसतिगृहातील विद्यार्थिनींना मेन्यूकार्डनुसार भोजन दिले जात नाही. एवढेच नाही, तर पोषण आहारही नियमानुसार मिळत नाही. मेनूकार्ड दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असताना मागणी करूनही आमदारांना मेनुकार्ड उपलब्ध करून दिले गेले नाही. भोजनाचा नमुनाही दाखविण्यात आला नाही. यानंतर त्यांनी स्वयंपाकगृहाची पाहणी केली. तेथील स्थिती पाहता भोजन कसे दिले जात असेल, यांची कल्पना आल्यानंतर आमदारांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला.
वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी रात्री एकही सुरक्षा रक्षक नसतो. अधीक्षकांसह इतर कर्मचारी खासगी ठिकाणी वास्तव्याला असतात. याविषयी डॉ. उईके यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादवेळी केवळ एक केळी दिल्या जाते. पपईच्या फोडी सोडल्या, तर इतर कुठलेही फळ आजपर्यंत देण्यात आलेले नाही. भोजन कंत्राटदाराकडून वस्तूंचा व्यवस्थित पुरवठा केला जात नाही. शालेय वस्तू आणि आवश्यक साहित्य ठेवण्यास कुठलीही व्यवस्था नाही. गणवेश भत्ता अजूनही दिल्या गेला नाही, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली. दरम्यान, प्रभारी प्रकल्प अधिकारी डाखोरे यांच्याशी संपर्क करून या वसतिगृहातील अनागोंदी कारभाराची माहिती देत दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची सूचना आमदारांनी दिली. कारभारात सुधारणा करण्याची तंबी कर्मचाऱ्यांनाही यावेळी देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
कळंब ग्रामीण रुग्णालयाला भेट
४आमदार डॉ.अशोक उईके यांनी ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली. रुग्णालयातील सुविधा दर्शनी भागावर लावण्याची सूचना त्यांनी केली. कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रकही तपासले. शिपाई, लिपीक, वाहनचालक दुसरीकडे डेप्युटेशनवर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. बांधण्यात आलेल्या निवासस्थानी पाण्याची तत्काळ पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार संतोष काकडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत, भाविक भगत, शंकर मांढरे, मनोज काळे, मधुकर खैरकार आदी उपस्थित होते.